रामलल्लाच्या दरबारात राहुल गांधी अन् प्रियांका वड्रांची हजेरी?
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दर्शन घेणार असल्याची चर्चा : अमेठी अन् रायबरेलीत उमेदवारी शक्य
वृत्तसंस्था /अयोध्या
7 टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची लढत अत्यंत चुरशीची ठरत चालली आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक जागा जिंकण्यासाठी स्वत:ची पूर्ण शक्ती झोकून दिली आहे. याचमुळे उत्तरप्रदेशच्या कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे अमेठीतून काँग्रेस नेते राहुल गांधी तर रायबरेलीतून प्रियांका वड्रा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे हे दोन्ही नेते उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अयोध्येत पोहोचून रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतात. 1 मे रोजी राहुल तर 3 मे रोजी प्रियांका वड्रा स्वत:चा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे मानले जात आहे.
राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. हे मतदान झाल्यावर राहुल गांधी आणि त्यांची टीम उत्तरप्रदेशात पोहोचू शकते. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी हे निवडणूक लढविणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. तर प्रियांका वड्रा या रायबरेली मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार असू शकतात. रायबरेली मतदारसंघात यापूर्वी सोनिया गांधी या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
1 मे रोजी अमेठीत राहुल गांधी तर 3 मे म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनी प्रियांका वड्रा रायबरेली मतदारसंघात स्वत:चा उमेदवारी अर्ज भरू शकतात. अमेठी आणि रायबरेलीत पाचव्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाशी गांधी परिवार जोडला गेलेला आहे. याचमुळे दोन्ही मतदारसंघात गांधी परिवाराचे सदस्यच निवडणूक लढवतील असे काँग्रेसच्या नेत्यांचे सांगणे आहे. अमेठीत मागील निवडणुकीत राहुल गांधी हे पराभूत झाले होते. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर मात केली होती. अमेठीतून यावेळी देखील स्मृती इराणी निवडणूक लढवत असल्याने राहुल गांधी हे तेथून निवडणूक लढविणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.