विकासासाठी मतभेद बाजूला सारुन अंजली निंबाळकर यांना विजय करा
तालुक्यातील मतदारांना महादेव कोळी यांचे आवाहन
खानापूर : काँग्रेसने तालुक्याला प्रथमच खासदारकीची उमेदवारी दिल्याने तालुक्याला दिल्लीत नेतृत्व करायची संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा उठवणे हे तालुक्यातील मतदारांच्या हातात आहे. यासाठी तालुक्यातील मतदारांनी राजकीय पक्षांचा किंवा मतभेदाचा विचार न करता अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्यावे, असे आवाहन खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, पाच वर्षाच्या कार्यकाळात निंबाळकर यांनी आमदार असताना तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांकडून खोटे आरोप केले जात आहेत. तसेच श्रेय लाटण्याचा प्रयत्नही केला जात आहे. मात्र विकास कोणी केला आहे हे जगजाहीर आहे. आता विधानसभेत तालुक्याचे नेतृत्व भाजप करत आहे. एक वर्ष झाले आमदारांनी विकासासाठी काय केले हे पहिला जाहीर करावे.
प्रथम आपण काय केले याकडे पहा
गेल्या 30 वर्षात खासदार अनंतकुमार हेगडे यांनी तालुक्यासाठी किती निधी उपलब्ध करून दिला आहे. कोणकोणत्या विकास योजना राबवल्या, हे पहिल्यांदा भाजप नेत्यांनी जाहीर करावे. तसेच डीसीसी बँकेत संचालक म्हणून गेल्या 15 वर्षात तालुक्यासाठी काय केले. तसेच तालुक्यातील युवकांना डीसीसी बँकेत किती नोकऱ्या लावल्या, स्वत:च्या वाट्याला आलेल्या नोकऱ्या दुसऱ्या तालुक्यात देऊन स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्यांनी दुसऱ्यावर आरोप करताना पहिला आपण काय केले आहे ते पहावे, भाजपची खालच्या पातळीवर तसेच वैयक्तिक टिका करण्याची संस्कृती आहे. मात्र काँग्रेस कधीही खालच्या पातळीवर प्रचार अथवा वैयक्तिक टिका कधीही करत नाही. आरोप करताना भान ठेवून आरोप करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. तालुक्याला देश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याने तालुक्यातील मतदारानी विकासाचा विचार करून अंजली निंबाळकर यांना भरघोस मतानी विजयी करावे, असे आवाहन महादेव कोळी यांनी केले आहे.