सामना रद्द झाल्याने पंजाब, दिल्ली अडचणीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना रद्द झाल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या बाबतीत दोन्ही संघ थोडे अडचणीत आहेत. गुऊवारी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर फ्लडलाइट वापरता येत नसल्याने त्यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.
रद्द झालेल्या सामन्यानंतर पंजाब किंग्स त्यांच्या 12 सामन्यांतून 7 विजय आणि 3 पराभवांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने 16 गुण जमा केले आहेत आणि प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना स्पर्धेतील शेवटच्या दोन सामन्यांपैकी फक्त एक जिंकणे आवश्यक आहे. तथापि, जर त्यांनी दोन्ही सामने गमावले, तरी त्यांच्याकडे पात्रता मिळविण्याची एक संधी असेल. कारण त्यांनी आधीच 16 गुण मिळवले आहेत. मात्र तशा स्थितीत त्यांची पात्रता नेट रन-रेट आणि इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, ज्यामध्ये 6 विजय आहेत आणि एकूण 14 गुण आहेत. 12 सामन्यांत त्यांनी 4 पराभव स्वीकारलेले आहेत. पात्रतेचा मार्ग मोकळा करण्यासाठी अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल, ज्यामुळे त्यांचे 18 गुण होतील. तथापि, जरी त्यांनी एक सामना जिंकला आणि एक गमावला, तरी त्यांना संधी कायम राहील. परंतु त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवर आणि नेट रन-रेटवर अवलंबून राहावे लागेल. जर त्यांनी दोन्ही सामने गमावले, तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. दिल्लीचे गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सविऊद्ध दोन सामने शिल्लक आहेत.
जर दिल्लीने गुजरात व मुंबईविरुद्धचे दोन्ही सामने गमावले, तर ते दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील आणि दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे गुणतालिकेत अव्वल दोन संघ आहेत. प्लेऑफची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामन्यांपैकी एक जिंकावा लागेल, कारण त्यांचे आधीच 11 सामन्यांतून आठ विजय आणि तीन पराभवांसह 16 गुण झालेले आहेत.