केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात तृणमूल खासदारांची निदर्शने
ईडी, सीबीआय, एनआयएच्या संचालकांना हटविण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील सत्तारुढ पक्ष तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांनी 8 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने कील होती, परंतु दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सोमवारीच सुटका केली होती. पण आता तृणमूलच्या नेत्यांनी दिल्लीतील पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने चालविली आहेत.
तृणमूलचे 10 सदस्यीय शिष्टमंडळ सोमवारी निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. यानंतर हे सदस्य धरणे आंदोलन करू लागले. ईडी, सीबीआय, एनआयए आणि प्राप्तिकर विभागाच्या संचालकांना त्वरित पदावरून हटविण्यात यावी अशी मागणी तृणमूलच्या नेत्यांची आहे. आम आदमी पक्षाने तृणमूलच्या या मागणीचे समर्थन पेले आहे.
दिल्लीचे मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी तृणमूल नेत्यांशी भेट घेत त्यांना समर्थन दर्शविले आहे. निवडणुकीची घोषणा झाली असून आचारसंहिताही लागू आहे. तरीही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणा कारवाई करत आहेत. हे जाणूनबुजून केले जात असल्याचा दावा भारद्वाज यांनी केला.
केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या यंत्रणांप्रमाणे काम करत आहेत. आम्ही त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध दर्शवित आहोत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशाप्रकारची कारवाई रोखण्यात यावी अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती तृणमूल नेत्या सागरिका घोष यांनी दिली आहे.
तृणमूल शिष्टमंडळाला कुठल्याही अनुमतीशिवाय निदर्शने करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची त्वरित मुक्तताही करण्यात आली होती अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महला यांनी दिली आहे. डेरेक ओब्रायन, मोहम्मद नदीमुल हक, डोला सेन, साकेत गोखले आणि सागरिका घोष हे खासदार तर अर्पिता घोष, शांतनु सेन, अबीर रंजन विश्वास या माजी खासदारांनी निदर्शनांमध्ये भाग घेतला. आमदार विवेक गुप्ता तसेच तृणमूल नेते सुदीप राहा देखील यात सामील झाले.