‘इनफ इज इनफ’ चे आज टीसीपीसमोर आंदोलन
नगरनियोजकांना सादर करणार सह्यांचे निवेदन
पणजी : नगर नियोजन खात्याने 39(ए) या वादग्रस्त कलमांतर्गत जमिनींच्या रुपांतरणांचा जो सपाटा लावला आहे त्याच्या विरोधात ‘इनफ इज इनफ’ने सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून याच मुद्यावरून आज दि 17 जुलै रोजी चळवळीतर्फे नगरनियोजन खात्याच्या पाटो येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘इनफ इज इनफ’ चे पदाधिकारी देविदास आमोणकर यांनी दिली. गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोविंद शिरोडकर यांचीही उपस्थिती होती.
सभेस उपस्थित लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या मुख्य नगरनियोजकांना सादर करण्यात येणार असून सभा शांततेत आणि सर्व कायद्यांचे पालन करून घेण्यात येणार आहे. त्यात भाजपसह सर्व पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आल्याचे आमोणकर यांनी सांगितले. सभा सकाळी 10 वाजता सुरू होईल. यावेळी क्लाऊड आल्वरिस व इनफ इज इनफचे पदाधिकारी आपली भूमिका मांडतील. त्यानंतर शिष्टमंडळ मुख्य नगर नियोजकांना भेटून निवेदन सादर करेल, असे त्यांनी पुढे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, राज्यातील विकासकामांना आमचा कोणताही विरोध नाही. मात्र त्याच विकासाच्या नावाखाली जमिनींचे भरमसाट रुपांतरण करणे योग्य नव्हे, असे सांगितले.
नगरनियोजन कायद्यातील कलम 39अ मुळे राज्यातील पर्यावरणाचा नाश होत आहे. त्यामुळे ते कलम रद्द झालेच पाहिजे. अन्यथा गोव्याच्या अस्मितेला कुणीच वाली राहणार नाही व काही काळानंतर ती संपुष्टात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारने दुऊस्त केलेले 39ए कलम महाघातक असून त्याचा सर्रास गैरवापर सुरू आहे. सर्व जमिनी रुपांतरासाठी खुल्या करण्यात येत आहेत. या रुपांतरणाचा येथील पर्यावरण, समाज आणि आर्थिक भवितव्यावर गंभीर परिणाम होणार आहे. याबाबत आम्ही यापूर्वीही राज्य सरकार, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना निवेदने सादर केली आहेत. हा लढा शांततापूर्ण मार्गाने लढायचा आहे. मात्र सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशावेळी कायदा हातात घेण्यासाठी सरकारने आम्हाला डिवचू नये, असा इशारा त्यांनी दिला.
गोविंद शिरोडकर यांनी बोलताना, राज्याचे अस्तित्व संपविणारे कलम 39अ रद्द झालेच पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली. तरीही सरकार अद्याप कानावर हात ठेऊन वावरत आहे. अशावेळी झोपलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून एकसंघता दर्शविण्यासाठी या सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिरोडकर यांनी केले.