शक्तिपीठ विरोधात बांदा ते वर्धा संघर्षयात्रा
कोल्हापूर :
शक्तिपीठ महामार्ग विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला व्यापक स्वरुप देत या लढ्यात बाधित शेतकऱ्यांसह अन्य घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. यासाठी मे अखेरीस बांदा ते वर्धा अशी शक्तीपीठ विरोधी संघर्ष यात्रा काढण्याचे नियोजन करुया. संघर्ष यात्रेतंर्गत बाधित 12 जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे घेऊया. गरज नसताना माथी मारण्यात येत असलेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधात सुरु केलेला लढा संघटितपणे यशस्वी करुया, असे आवाहन विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गुरुवारी सायंकाळी ऑनलाईन बैठक झाली. बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. यावेळी सध्या भारत-पाकिस्तान युद्धजन्यस्थिती असल्याने मे अखेरिस शक्तिपीठ विरोधी संघर्ष यात्रा काढण्याबाबत नियोजन करण्याचे ठरले.
बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारे ग्रामसभांचे ठराव संकलित करण्यास सुरुवात करा. राज्यात होणाऱ्या विकासाला विरोध नाही पण रत्नागिरी-नागपूर महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची गरज काय अशी आमची भूमिका आहे. हा महामार्ग सत्ताधाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण आहे. त्यामुळे प्रकल्प रेटला जात असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, पुणे-बेंगलूर महामार्गावरील भरावाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापूराचा फटका बसत आहे. आता शक्तिपीठ महामार्गासाठी टाकल्या जाणाऱ्या भरावाने महापूराचे संकट आणखी वाढणार आहे. तसेच इको सेंन्सीटिव्ह झोनमधून हा रस्ता जाणार असल्याने पर्यावरणाचेही नुकसान होणार आहे. हे मुद्दे सर्वसामान्य नागरिकांना पटवून द्यावे लागणार आहेत. मुठभर राजकीय नेत्यांच्या हव्यासापोटी महामार्ग लादला जात असल्याचे जनतेच्या निदर्शनास आणून देऊया, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरीत लवादामध्येही जावे लागेल, असे सांगितले.
आमदार कैलास पाटील यांनी महामार्ग रद्द करण्याबाबत ग्रामसभेचे ठराव करावेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव निर्माण करुया, अशी सूचना मांडली. माजी आमदार वैभव नाईक यांनी शक्तिपीठ संदर्भात सत्ताधाऱ्यांकडून झुंडशाहीची वक्तव्य सुरु आहेत. मात्र शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. त्यांच्या विरोधाला पाठबळ देऊया अशी सूचना केली.
बैठकीमध्ये बीडचे अजय बुरांडे, लातूरचे गजेंद्र येळकर, सिंधूदूर्गचे सतीश ललीत, सांगलीचे उमेश देशमूख, हिंगोलीचे केतन सारंग, नांदेडचे सतीश कुलकर्णी, धाराशिवचे अभिजीत देशमुख, यवतमाळचे बाबासाहेब गतांडे, सोलापूरचे विजय पाटील आदींनी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असुन शासनाचा महामार्गासाठी मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला असल्याचे सांगितले.
- सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना पत्र द्या
12 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबतचे पत्र द्यावे, तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना महामार्गाबाबत त्यांची भुमिका काय याची विचारणा करा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
- दडपशाही केल्यास संपर्क साधा
शक्तिपीठ विरोधातील आंदोलनातील सहभागी सर्व आजी-माजी आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. 12 जिल्हयात कुठेही दडपशाहीचा प्रकार घडल्यास तत्काळ लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा. आंदोलनातील सर्व लोकप्रतिनिधींचे शेतकऱ्यांना पाठबळ राहिल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी दिला.
- प्रातांची पाद्यपूजा करा
शक्तिपीठसाठीचा मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणुन पाडला आहे. तरीही काही ठिकाणी अजून हालचाली सुरु आहेत. याच्या निषेधार्थ 12 जिल्ह्यात प्रांतांची पाद्यपूजा करणारे आंदोलन करुया, अशी सूचना सोलापूरचे विजयकुमार पाटील यांनी केली.
- संरक्षणासाठी पोलीस प्रशासनाला पत्र द्या
शक्तिपीठ महामार्गासाठी आम्ही जमिनी दिलेल्या नाहीत. तरीही शासन व संबंधित कंपनीकडुन जमीन मोजणीचा घाट घातला जात आहे. त्यामुळे विशेषत: महसूल विभाग व संबंधित कंपनीपासुन संरक्षण मिळावे, असे पत्र पोलीस प्रशासनाला द्या अशीही सूचना बैठकीत करण्यात आली.
- न्यायालयात याचिका दाखल करा
शक्तीपीठ महामार्ग विरोधात आत्ताच न्यायालयात याचिका दाखल करा, अशी सूचना हिंगोलीचे केतन सारंग यांनी केली. यासंदर्भात चर्चा करुन न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.