चक्क रस्त्यावरच भातरोप लागवड करून निषेध
रस्त्याच्या मागणीसाठी रामगुरवाडीवासियांचा पवित्रा
खानापूर : रामगुरवाडी गावच्या संपर्क रस्त्यासाठी तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी तरुणांनी रस्त्यावरील चिखलात भात रोप लागवड करून शासनाचा निषेध केला. खानापूर-जांबोटी रस्त्यावर शहरापासून अवघ्या तीन कि. मी. वर असलेल्या रामगुरवाडी गावचा संपर्क रस्ता वर्षापूर्वी माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या निधीतून 20 लाख रु. खर्चुन करण्यात आला होता. मात्र एका महिन्यातच हा रस्ता उद्ध्वस्त झाल्याने ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठविला होता. मात्र शासनाने याची दखल घेतली नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी कोणत्याच उमेदवाराला गावात प्रचारासाठी घेणार नसल्याचे फलक लावून उमदेवारांना गावबंदी केली होती. त्यावेळी विधानसौध निवडणुकीसाठी निवडणूक लढवणारे विठ्ठल हलगेकर यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधून निवडणूक झाल्यानंतर मी आमदार झालो किंवा न झालो तरी तुमचा रस्ता माझ्या स्वखर्चातून करून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यामुळे रामगुरवाडी ग्रामस्थांनी भाजपला एकमुखी पाठिंबा जाहीर केला होता. निवडणुकीनंतर आमदार विठ्ठल हलगेकर हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ग्रामस्थांनी वेळोवेळी संपर्क साधून रस्त्याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र आमदारांनी याकडे पूर्णपणे वर्षभरात कानाडोळा केला. आता गेल्या दीड महिन्यापासून जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले असून संपूर्ण रस्ताच चिखल आणि खड्ड्यांनी व्यापल्याने या रस्त्यावरुन चालत जाणेही अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे रामगुरवाडी येथील युवकांनी मंगळवारी सकाळी या रस्त्यावर भात रोप लागवड करून आंदोलन केले. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे रामगुरवाडी रस्ता पुन्हा ठळक चर्चेत आला असून यावेळी लक्ष्मण मोटर, दत्तू मोटर, राजू माळवे, पुंडलिक ठोंबरे, संजू मादार, खंडोबा वाघमारे यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आश्वासन देऊन देखील रस्त्याबाबत दखल घेतली नसल्याने तीव्र संताप व्यक्त करत हे आंदोलन हाती घेतले. यावेळी रामगुरवाडी ग्रामस्थ आणि युवक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.