21 व्या राष्ट्रीय जनावर गणतीला चालना
1919 पासून देशात उपक्रम : मोबईल अॅपद्वारे गणती करणार
बेळगाव : पशुसंगोपन खात्यातर्फे 21 वी राष्ट्रीय जनावर गणती दि. 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. दि. 31 डिसेंबरपर्यंत ही गणती करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन मोबईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे. 21 स्टे लाईव्ह स्टॅक सेन्सेस या नावे अॅप देण्यात आला आहे. या गणती उपक्रमाला जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये चालना देण्यात आली. जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पशुसंगोपनचे उपसंचालक डॉ. राजू कुलेर, डॉ. अनंत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत चालना दिली. बेळगाव जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन जनावर गणती केली जाणार यासाठी 247 गणतीदारांची नियुक्त करण्यात आली आहे. 54 पर्यवेक्षक यावर असणार आहेत. तसेच नोडल अधिकारी यांच्या निरीक्षणामध्ये गणती केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये शहरीभागात 3 लाख 24 हजार 584 कुटुंबांची संख्या आहे. ग्रामीण भागात 8 लाख 35 हजार 657 कुटुंबे आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण अंदाजे 11 लाख 60 हजार 241 कुटुंबे असून नेमणूक केलेले गणतीदार घरोघरी जाऊन गणती करणार आहेत. जनावरांच्या गणतीसाठी घरी येणाऱ्या गणतीदारांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन पशुसंगोपन खात्याकडून करण्यात आले आहे.
100 वर्षात 20 वेळा जनावरांची गणती
देशभरात जनावरांची गणती केली जात आहे. 1919 पासून जनावरांची गणती केली जात आहे. गेल्या 100 वर्षात 20 वेळा जनावरांची गणती करण्यात आली आहे. दि. 1 सप्टेंबरपासून 21 वी जनावर गणती सुरू करण्यात येत आहे. अॅपच्या माध्यमातून ही गणती केली जात आहे. गणतीदारांना प्रशिक्षण देऊन विशेष युजर आयडी देण्यात आला आहे. या माध्यमातून जनावरांची संख्या व जनावर पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सरकारला मिळणार आहे. त्यामुळे भविष्यातील योजना ठरविण्यासाठी ही जनावरांची गणती उपयोगी ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.