1991 पूर्वीच्या घरांच्या संरक्षणाची प्रक्रिया सुरू
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : श्रीपाद नाईक यांच्या प्रचारास प्रारंभ
म्हापसा : राज्यातील 1991 पूर्वीच्या घरांना सरंक्षण देण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली असून ही सर्व घरे सुरक्षित राहणार आहेत. ज्यांच्याकडे वीज, पाणी, घरपट्टी पावती असेल त्या सर्व घरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता संपल्यावर यावर 100 टक्के उपाययोजना होईल, ही आपली व पंतप्रधान मोदीजींची गॅरंटी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शापोरा बंदीरवाडा येथे बोलताना सांगितले. यावेळी ‘विकसीत भारत मोदी की गॅरंटी संकल्प पत्र अभियान’ तसेच उत्तर गोव्याचे भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आमदार डिलायला लोबो, आमदार मायकल लोबो, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, जिल्हा पंचायत सदस्य निहारिका मांद्रेकर, सनीशा तोरस्कर, मंडळ अध्यक्ष मोहन दाभाळे, शिवोली मतदारसंघातील सरपंच, पंच आदी मान्यवर उपस्थित होते.
युवकांनी मत्स्य व्यवसायाकडे वळावे
मच्छीमारी हा गोमंतकीयांचा पारंपरिक व्यवसाय आहे. राज्यात 502 मत्स्य व्यावसायिक सरकार दरबारी नोंद आहेत. त्यांच्यासाठी विविध योजनांद्वारे 22 कोटी रुपये वितरित केले आहेत. नवीन युवक मत्स्य व्यवसायात उतरले पाहिजेत. केज फार्मिंगमध्ये खूप वाव आहे, मात्र आतापर्यंत फक्त एकट्यानेच अर्ज केला आहे. मत्स्य व्यावसायिकांना क्रेडीट कार्ड मिळते. या सर्वांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
राबविली अनेक विकासकामे
आमदार डिलायला लोबो म्हणाल्या की, श्रीपादभाऊ नाईक आपल्या खासदारकीची 25 वर्ष पूर्ण करून आता पुन्हा निवडणुकीत उतरत आहेत. तसेच मुख्यमंत्री आज आपल्या मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षे पूर्ण करीत आहेत. या आनंदाच्या गोष्टी आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या मतदारसंघात खूप कामे केली आहेत. राहिलेली कामेही लवकरच पूर्ण होतील, असा विश्वासही लोबो यांनी व्यक्त केला.
भारत जगातील पहिला देश बनणार
खासदार श्रीपाद नाईक म्हणाले की, आपणास पंचवीस वर्षे खासदार म्हणून जनतेने निवडून दिले. समाजासाठी आपण जे करतो, त्यात आम्ही प्रसिद्धीसाठी मागे राहिलो असलो तरी कामे करतच राहणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देशाचा विकास घडत असून नवा भारत घडत आहे. 2047 साली हा देश जगातील पहिला देश बनणार आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ग्रामस्थांनी मांडल्या समस्या
बंदीरवाडा येथे गणेश विसर्जन घाट, कार्यक्रम करण्यासाठी जागा, मच्छीमारांसाठी रॅम्प बांधावा, वाहन पार्किंगसाठी सोय करावी अशा मागण्या ग्रामस्थांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या.