मनपातील जन्म-मृत्यू दाखला वितरण विभाग बंद केल्याने समस्या
कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपले
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या कामाला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे आता जन्म आणि मृत्यू दाखल्याचा विभागही बंद ठेवण्यात आला आहे. हा विभाग बंद असल्याने नागरिकांना जन्म-मृत्यू दाखला मिळणे कठीण झाले आहे. भर उन्हामध्ये मनपाकडे येवून रिकाम्या हाती माघारी फिरावे लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी मनपातील सर्व कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये गुंतविण्यात आले आहे. त्यामुळे नियमित कामांवर परिणाम होत आहे. निवडणूक जाहीर झाली तरी जन्म आणि मृत्यू दाखला वितरणाचे काम आतापर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. मात्र आता तो विभागही बंद करण्यात आला आहे. विविध शासकीय कामांसाठी, त्याचबरोबर शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना मुलांच्या जन्म दाखल्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर निधन झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखलादेखील घेणे गरजेचे असते. वारसा करणे व इतर कामांसाठी दाखला महत्त्वाचा असून तो मिळविण्यासाठी धडपड केली जात आहे. मात्र शुक्रवारी हा विभाग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. याबाबत मनपाने कोणत्याच प्रकारचे आवाहन केले नव्हते. त्यामुळे अनेक जण जन्म आणि मृत्यू दाखला घेण्यासाठी संबंधित विभागात आले असता त्यांना रिकाम्या हाती मागे फिरावे लागले. उन्हामध्ये हेलपाटे मारावे लागल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. किमान सकाळच्या सत्रात तरी जन्म आणि मृत्यू दाखले देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.