खासगी कर्मचाऱ्यांना लवकरच ‘किमान वेतन’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : बांबोळी रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पणजी : कामगार व रोजगार आयुक्तालयातर्फे बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित केलेल्या ‘जॉब फेयर’ 2026 (रोजगार मेळावा) च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी रोजगारमंत्री बाबुश मोन्सेरात यांचीही उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभला. खासगी क्षेत्रातील या रोजगार मेळ्dयास राज्यातील विविध भागातून आलेल्या तरुण - तरुणींनी मोठी गर्दी केली. काहीजणांनी अर्ज सादर केले तर अनेकांनी मुलाखती दिल्या. या मेळाव्यात 150 खासगी कंपन्यांनी भाग घेतला आणि 3500 नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन दिली. प्रत्यक्षात या मेळाव्यातून कितीजणांना नोकऱ्यांचा लाभ झाला याचा तपशील कालांतराने मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
नोकरीसाठी कौशल्य,अनुभवाला महत्त्व
नोकरी करताना त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी म्हणून काही विद्यापीठांकडे सरकारतर्फे करार करण्याचा विचार आहे. आरोग्य, आयटी, आदरातिथ्य, हवाई वाहतूक, बँक, टेलिकॉम आणि इतर अनेक क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा मेळाव्यात सहभाग होता. यापुढे दहावी, बारावी किंवा पदवी - पदविका पर्यंतचे शिक्षण नोकरीसाठी पुरेसे ठरणार नाही तर कौशल्य, अनुभव याला महत्त्व आले असून त्याशिवाय नोकरी मिळणे कठीण आहे. म्हणून रोजगार मेळाव्यातून जी संधी मिळते ती सोडू नका आणि त्यातून पुढे चला, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
या मेळाव्यासाठी सुमारे 10 हजार जणांनी नोंदणी केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. सकाळी 10 वा. सुरु झालेला हा मेळावा सायं. 6 वा.पर्यंत चालू होता.खासगी कंपन्यांची विविध दालने तेथे तयार करण्यात आली होती आणि त्यांचे अधिकारी तेथे बसून आलेल्या उमेदवारांशी चर्चा करीत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी समई प्रज्वलीत करुन मेळाव्याचे उद्घाटन केले. रोजगार आयुक्त राजेश आजगांवकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. रोजगारमंत्री मोन्सेरात यांचेही भाषण झाले. या मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद पाहता गोव्यात बेकारी ही एक प्रमुख समस्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
12 रोजगार मेळाव्यातून 2 हजार जणांना नोकऱ्या
आयटीआय किंवा इतर संस्थांमध्ये कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यांचे शिक्षण घेतल्यास नोकरी मिळणे सुलभ होते. नोकरी करताना देखील ते शिक्षण घेतल्यास नवीन संधी मिळतील. खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन त्या स्थानिकांना मिळतील यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. सांखळी आरोग्य संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या 1500 जणांना नोकरीचा लाभ झाल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. आतापर्यंत 12 रोजगार मेळावे झाले आणि त्यातून सुमारे 2000 जणांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.