वक्फ कायदा रद्द करण्यासंबंधीचे खासगी विधेयक चर्चेसाठी मंजूर
काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केला जोरदार विरोध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वक्फ कायदा 1995 रद्द करण्यासाठी भाजपचे राज्यसभा सदस्य हरनाथ सिंह यादव यांनी मांडलेल्या खासगी विधेयकावर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. अखेर मतदानानंतर ते चर्चेसाठी स्वीकारण्यात आले. यावर चालू अधिवेशनातच चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदानादरम्यान विधेयकाच्या बाजूने 53 तर विरोधात 32 मते पडली. यावेळी राज्यसभा अध्यक्ष धनखड आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
वक्फ कायदा 1995 हा लोकशाहीच्या विरोधात आहे आणि देशाच्या सर्व कायदेशीर व्यवस्थेला अनुसरून नसल्यामुळे देशाच्या हिताच्या दृष्टीने तो रद्द केला पाहिजे, असे मत शुक्रवारी हे विधेयक मांडताना हरनाथ सिंह यादव यांनी व्यक्त केले. त्यांच्या या मतप्रदर्शनाला काँग्रेससह माकप, भाकप, एनसीपी, डीएमके, तृणमूल काँग्रेस आणि आरजेडीसह सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी याला विरोध करत भाजपवर ध्रुवीकरण आणि जातीय फूट निर्माण केल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी तात्काळ मतदान घेण्याची मागणी केली. मात्र सभापती जगदीप धनखड यांनी सुरुवातीला नियमांचा हवाला देत विधेयकाला विरोध करणाऱ्या सदस्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. यानंतर, विधेयकावरील मतांच्या विभाजनात विधेयकाला पाठिंबा म्हणून निकाल समोर आला.