‘सूर्योदय’ सोलर योजनेची पंतप्रधानांची घोषणा
देशभरातील एक कोटी लोकांना लाभ मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर ट्विट करून ‘प्रधानमंत्री सौर योजने’ची घोषणा केली. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार आहे. तसेच भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल. मोदी सरकारने देशातील एक कोटी घरांच्या छतावर ऊफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, ही योजना प्रथम कोठे स्थापित केली जाईल याचा आराखडा सरकार लवकरच सादर करू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते. अयोध्येहून परतताच त्यांनी नवी दिल्लीत बैठक घेतल्यानंतर त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली. ‘जगातील तमाम भक्तांना प्रभू श्रीरामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळत असते. याच अनुषंगाने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर भारतातील जनतेला आपल्या घराच्या छतावर सोलर यंत्रणा बसविण्यासाठीची योजना केंद्र सरकार सुरू करत आहे’, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींनी गेल्यावषी जुलैमध्ये रुफटॉप सोलरसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू केले होते. या योजनेअंतर्गत सोलर प्रकल्पातून निर्माण होणारी वीज थेट ग्रीडमध्ये जाते आणि घरगुती वीज बिल कमी होते. एक किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प सुमारे 1200 ते 1400 युनिट वीज तयार करतो, असे दिसून आले होते.
फायदा कोणाला होणार?
सूर्योदय योजनेचा सर्वाधिक लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या ग्राहकांना वीज बिलावर मोठा खर्च करावा लागतो. वीजबिलावरूनही देशात राजकारण झाले आहे. कधी बिलमाफीच्या मुद्यावर तर कधी मोफत विजेच्या मुद्यावरून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून अशा मुद्यांवरून राजकारण संपवण्याचा प्रयत्नही सरकारने केला आहे.