तामिळनाडूतील पूरस्थितीचा पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तामिळनाडू राज्यात महापुरामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने या राज्याला यापूर्वीच अर्थसाहाय्य केले असून पूरग्रस्तांच्या साहाय्यता कार्यासाठी केंद्रीय दले पाठविली आहेत. आतापर्यंत किती प्रमाणात पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले, याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत घेतली आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे पुरामुळे वाहतूक आणि सामान्य जनजीवन ठप्प झाले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली होती. अशीची स्थिती राज्यातील अन्य काही शहरांचीही झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच आतापर्यंत कोणते आणि किती साहाय्यताकार्य करण्यात आले आहे, याचीही माहिती त्यांनी घेतली.
आणखी साहाय्य करणार
आवश्यकता भासल्यास तामिळनाडू राज्याला आणखी अर्थसाहाय्य केले जाईल, तशीच साधनसामग्रीचेही साहाय्य पाठविण्यात येईल. राज्य सरकारने त्याची नेमकी आवश्यकता केंद्राच्या दृष्टीस आणून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले असून आणखी माहितीही मागविली आहे.