टोमॅटोच्या दराने गाठली शंभरी
80 ते 100 रुपये किलो, भाजीपाल्याचे दरही भिडले गगनाला
बेळगाव : टोमॅटोसह सर्वच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दराने शंभरी गाठली आहे. यामुळे एरव्ही किलो-दोन किलो खरेदी करणाऱ्या गृहिणी सध्या अर्धा आणि पाव किलोवर समाधान मानत आहेत. बेळगाव बाजारपेठेत 80 ते 100 रुपयांनी टोमॅटोची विक्री सुरू असल्याने पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणेच टोमॅटोचे दर वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जेवणामध्ये मिठाप्रमाणे टोमॅटो लागतोच. डाळ असो वा भाजी यासह सर्व खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा सर्रास वापर होतो. मागील महिनाभरापासून 50 ते 60 रुपयांवर असलेला टोमॅटो दोन दिवसांत 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दर अचानक चढल्याने काही निवडक विक्रेत्यांकडेच टोमॅटो उपलब्ध असल्याचे दिसत आहे. पावसामुळे नवीन पीक बाजारात दाखल झाले नसल्याने टोमॅटो दर वाढल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
टोमॅटो दरामुळे चिंचेला मागणी
टोमॅटोचा दर शंभरीकडे पोहोचल्याने पर्याय म्हणून चिंचेला मागणी वाढली आहे. सर्वसामान्यांना टोमॅटो परवडणारा नसल्याने डाळी व भाज्यांमध्ये चिंचेचा वापर करावा लागत आहे. हॉटेलमधील कोशिंबिरीतून टोमॅटो गायब झाला आहे. यामुळे चिंचेला मागणी वाढली असून जोवर दर कमी होत नाही, तोवर जेवणात टोमॅटो कमी असण्याची शक्यता आहे.
इतर भाजीपाल्यांचेही दर वाढले
केवळ टोमॅटोच नाही तर इतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. वांगी 40 ते 50 रुपये प्रतिकिलो, बिन्स 40 रु. प्रतिकिलो, शिमला मिर्ची 40 ते 50, भेंडी 40 ते 50 या दराने विक्री केली जात आहे.