मतदान केंद्रे सज्जतेची तयारी जोरात सुरू
पणजी : देशभरात लोकसभा निवडणूक होत असून, गोव्यातही मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मतदात्यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. मतदान केंद्रांवर लहान मंडप उभारणीचे काम सुरू आहे. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, याची खबरदारी राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतली आहे. त्याचबरोबर अधिकधिक मतदार मतदान करतील, यासाठीही प्रयत्न केले जात आहे. गोव्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे चार दिवसांवर निवडणूक आल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याचा अभ्यास करून त्या प्रमाणे सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात येणार आहे. मतदान केंद्रे सज्ज होण्यासाठी गतिमान पावले उचलण्यात आली आहेत.
जमावबंदी आदेश जारी
मतदान केंद्राच्या परिसरातील 200 ते 250 मीटर या अंतरावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी जमाव होऊ नये किंवा जमावाने कुणी येऊ नये, यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाने योग्य ती खबरदारी आत्तापासूनच घेतली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा यासाठी निवडणूक कार्यालयातर्फे ‘मतदानाचा अधिकार व जबाबदारी’ या आशयाचे फलक व पोस्टर पणजी शहरात तसेच राज्यातील बहुतांश ठिकाणी लावले आहेत.
मतदारांनी पाठ फिरवू नये
मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदानाचा हक्क बजावण्यापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक कार्यालयातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे. मतदान करणे हे पवित्र काम असल्याने याकडे मतदारांनी पाठ फिरवू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पिण्याच्या पाण्याची सोय
मतदान केंद्रावर मंडप उभारण्याबरोबरच मतदारांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. शिवाय मतदारांना केंद्रावर मतदान करण्यासंबंधी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय सुरक्षा रक्षकांची नेमणूकही होणार आहे. संवेदनशील भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकडे पोलिसांची करडी नजर आहे.
भरारी पथकांकडून तपासणी
निवडणूक काळात नेमण्यात आलेल्या भरारी पथकांच्या अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक केंद्रांची तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक ठिकाणच्या केंद्रावर भरारी पथकांनी तपासणी केलेली असून, उर्वरित तपासणी येत्या एक दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.