सोसाट्याच्या वाऱ्यासह येळळूर परिसरात वळिवाचे आगमन
अनेक विद्युतखांब-झाडे कोसळली : तीन तास वाहतूक ठप्प
वार्ताहर/येळळूर
मंगळवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वादळी वारा आणि वळीव पावसामुळे येळ्ळूर वेशीतील दोन झाडे उन्मळून तर चार विद्युतखांब मोडून पडल्याने मुख्य मार्ग छ. शिवाजी रोड बंद झाल्याने जवळपास तीन तास वाहतूक ठप्प झाली. यामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. दुचाकी वाहनचालकांनी पर्याची मार्ग शोधून घर गाठले. सुदैवाने रस्त्यावर खांब आणि झाडे पडल्याने मालमत्तेची फारशी हानी झाली नाही.
गेले चार दिवस पडणारा सकाळचा गारवा आणि दिवसभर कडाक्याचे ऊन या बदलत्या वातावरणाने वळिवाचे आगमन लांबवते की काय, अशी स्थिती असताना मंगळवारी दुपारी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह येळळूर परिसरात वळिवाचे आगमन झाले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून विद्युतखांब मोडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. गावच्या सभोवती वळीव कोसळत असताना येळळूर परिसराला मात्र वळिवाने झुकांडी दिली होती. पण वळिवाने अचानक जोरदार हजेरी लावली. हा पाऊस शेती कामासाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दुपारी अचानक जोरदार वारे सूटून विजेच्या कडकडाटासह वळीव कोसळत असताना वाऱ्याच्या वेगामुळे येळळूर वेशीत दोन झाडे कोसळली तर चार विद्युतखांब मोडून पडल्याने मुख्य मार्ग बंद पडून वाहतूक बंद पडली. त्यामुळे वडगावच्या बाजूने वाहनांची लांबच लांब रांग लागून राहिली होती. गावात प्रवेश करण्याचा मुख्य मार्गच बंद झाल्याने सर्वच वाहनधारक अडकून पडले. पर्यायी मार्ग नसल्याने त्यांच्याजवळ मार्ग मोकळा होण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
पडलेले खांब आणि तुटलेल्या तारा बाजूला करण्यासाठी
हेस्कॉम कर्मचारीवर्ग युद्धपातळीवर काम करत मार्ग मोकळा करण्यासाठी झटत होता. तर गावातील तरुण वर्ग कोसळलेली झाडे बाजुला करण्यासाही जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यासाठी झटतानाचे चित्र होते. खंडित वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील, अशी स्थिती असल्याने दोन ते तीन दिवस गाव अंधारात रहाणार आहे. गावातील मुख्य रस्ता बंद पडल्याने होणाऱ्या गर्दीला नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करीत गर्दीवर नियंत्रण ठेवले होते. त्यामुळे फारसा गोंधळ झाला नाही. येवढी मोठी घटना भर वेशीत घडूनही सुदैवाने फारशी मालमत्तेची हानी किवा थांबलेल्या नागरिकांना कोणताच धोका झाला नाही, हे सुदैवच म्हणावे लागेल, अशी चर्चा सुरू होती.