'मान्सूनपूर्व' ने परशुराम घाटातील कामांना 'ब्रेक'
चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या कामांना गती मिळाली असतानाच गेले ३ दिवस कोसळत असलेल्या मान्सूनपूर्वने मान्सूनपूर्वन ब्रेक लागला आहे. धोकादायक दरडींच्या ठिकाणी सुरू असलेले लोखंडी जाळी ठोकण्याचे काम आणि गॅबियन वॉल उभारणीच्या कामात गेले ३ दिवस कोसळत असलेल्या पावसाने खोडा घातला आहे. त्यामुळे कामासाठीची असलेली यंत्रसामुग्री जाग्यावरच असून आता सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
गेल्या २ वर्षांपासून न परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्यात आले असून पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे कामही वेगाने सुरू केले आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या सहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे कामही मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा येथे कार्यरत आहे.
- पावसाच्या दमदार हजेरीमुळे नियोजन विस्कटले
गेल्या ३ दिवसांपासून मान्सूनपूर्व दाणादाण उडालेली असल्याने आणि त्यातच परशुराम घाट हा धोकादायक स्थितीत असल्याने साहजिकच तेथील कामे पावसामुळे ठप्प झाली आहेत. गुरुवारी घाटाची पाहणी केली असता सर्व यंत्रसामुग्री जाग्यावरच असल्याचे निदर्शनास आले. पाऊस थांबला तरच पुढील कामांना गती येणार असल्याने साहजिकच सर्वांच्या नजरा पाऊस थांबण्याकडे लागल्या आहेत. कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो. त्या दृष्टीने महामार्ग व कंत्राटदार कंपनीने आपल्या कामांचे नियोजन केले आहे. मात्र १५ दिवस अगोदरच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नियोजन विस्कटले आहे.