मडुरा पंचक्रोशीत वीज वाहिन्या, खांब धोकादायक स्थितीत
वीज ग्राहकांचा उपोषणाचा इशारा
न्हावेली / वार्ताहर
पावसाळा तोंडावर आला असून वीज वितरण मात्र अपेक्षित कामगिरी बजावत नाही. मडुरा, रोणापाल, पाडलोस, निगुडे, कास, सातोसे, आरोस गावातील जीर्णावस्थेतील वीज वाहिन्या व खांब धोकादायक बनले आहेत. उष्णता कमालीची वाढली असून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शेतकरी, लहान उद्योजक, बागायतदारांसह इतरांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे तत्काळ वीज समस्या कायमस्वरुपी सोडवा अन्यथा सर्व ग्रामस्थांना घेऊन उपोषण छेडण्याचा इशारा पाडलोस सहकारी सोसायटी माजी संचालक आनंद कुबल यांनी दिला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात झालेल्या चक्रिवादळामुळे मडुरा, रोणापाल, पाडलोस, निगुडे, कास, सातोसे, आरोस भागात वीज वाहिन्या व खांब कोसळले होते. त्यामुळे काहीकाळ ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले होते. ट्रान्सफार्मर विजेचा भार उचलू शकत नसल्यामुळे वीज गुल होते. उन्हाळ्यात पंख्याशिवाय राहणे अशक्य आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार, राजकीय नेत्यांना निवेदने देण्यात आली. मात्र त्याचा उपयोग झाला नसून फक्त आश्वासने मिळाली. त्यामुळे जनता आश्वासनांसह वीज समस्येने हैराण झाल्याचे श्री.कुबल यांनी सांगितले.
वीज वाहिन्या, खांब धोकादायक
सदर गावांमध्ये वीज वाहिन्या व खांब धोकादायक स्थितीत आहेत. याकडे लक्ष न दिल्यास पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वीज समस्या निर्माण होणार आहे. सावंतवाडी आणि बांदा येथील विभागीय अभियंते आश्वासने देऊन वेळ मारून नेतात. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून मडुरा, रोणापाल, पाडलोस, निगुडे, कास, सातोसे, आरोस गावातील वीज ग्राहक उपोषण छेडणार असल्याचे पाडलोस येथील बागायतदार प्रेमानंद साळगावकर यांनी सांगितले.