प्रशासनाने नाही ; ग्रामस्थांनी करून दाखवले !
श्रमदानातून वाडीजोड रस्त्यांवरील बुजवले खड्डे ; मळगाव ग्रामस्थांची 'सामाजिक बांधिलकी'
न्हावेली / वार्ताहर
येथील मुख्य राज्यमार्गाला जोडणाऱ्या बाजारपेठ ते वेत्येरोड ग्रामपंचायतच्या वाडीजोड रस्त्यांचे काम ठेकेदाराकडून निधीअभावी अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले होते.या वाडीजोड रस्त्यावरील खडीकरण पावसाळ्यात वाहुन जाऊन रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा ञास सहन करावा लागत होता.ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती, त्यामुळे वेत्येरोड भागातील ग्रामस्थांनी एकञ येत खडी, वाळू,सिंमेट गोळा करत सदरील रस्त्यावर पडलेले खड्डे श्रमदानातून बुजवले. शिवाय रोडवर आलेली झाडीझुडपे तोडण्यात आली, इथे पडलेल्या खड्ड्यामुळे बाईकस्वारांचे अपघातही घडले होते. आता केलेल्या डागडुजीमुळे थोड्या प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला.या कामासाठी मळगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय धुरी यांच्यासह मंगेश राऊळ, मदन शिरोडकर, काशीनाथ सोनुर्लेकर, विलास राऊळ , प्रकाश साळगावकर, अथर्व धुरी, प्रथमेश खडपकर, सुरेश गावडे, श्री.इंगळे यांनी श्रमदान केले.या रस्त्याचे अपुर्ण अवस्थेतील डांबरीकरण ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन निधी उपलब्ध करुन लवकरात लवकर पुर्ण करुन घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.