राजभवन परिसरात तैनात पोलिसांना हटविले
पश्चिम बंगाल राज्यपालांनी उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी सोमवारी सकाळी राजभवनात तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित परिसरातून बाहेर पडण्याचा आदेश दिला आहे. सी.व्ही. आनंद बोस हे राजभवनच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराला जनमंचात बदलण्याची योजना आखत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
राज्यपालांनी प्रभारी अधिकाऱ्यासमवेत राजभवनाच्या आत तैनात पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित परिसर खाली करण्याचा निर्देश दिला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांकडून भाजप नेते शुभेंदु अधिकारी आणि लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसेच्या पीडितांना बोस यांची भेट घेण्यापासून रोखले होते. या घटनेनंतरच राज्यपालांनी हे पाऊल उचलले आहे.
पोलिसांनी सीआरपीसीचे कलम 144 चा दाखला देत विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांना राजभवनात प्रवेश करण्यापासून रोखले हेत. राजभवनाच्या बाहेर कलम 144 लागू असून याच्या अंतर्गत मोठ्या सभांवर बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यपाल आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. कुठल्या आधारावर पोलिसांनी शुभेंदु अधिकारी यांना राजभवनाच्या परिसरात येण्यापासून रोखले अशी विचारणा राज्यपालांनी केली आहे.
शुभेंदु अधिकारी आणि अन्य काही जणांनी कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लेखी अनुमतीनंतरही पोलिसांनी राजभवनात प्रवेश करण्यापासून रोखल्याचा दावा शुभेंदु अधिकारी यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसने राज्यात हिंसा केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.