Ratnagiri Crime: तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील हवालदार निलंबित
हलगर्जीपणाची गंभीर दखल घेऊन चौकशीअंती सोनावणे हवालदाराला निलंबित केले
रत्नागिरी : जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक पोलीस कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तींच्या अर्जांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशी अंती पोलीस हवालदार प्रसाद सोनावणे याला निलंबित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका होत होती. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच, पहिली कारवाई म्हणून कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, 6 जून 2024 राकेश जंगम याचा खून करून त्याचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून देण्यात आला होता. या खुनाच्या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीदरम्यान राकेशची हत्या केल्याची कबुली दिली. दुर्वास पाटील याच्यासोबत या गुह्यात विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
मृत राकेश जंगम हा दुर्वास पाटील यांच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. 21 जून 2024 राकेशची आई जयगड पोलिस ठाण्यात राकेश बेपत्ता असल्याचा तक्रार अर्ज दिला होता. पण त्याचा शोध लागला नाही. पोलिसांच्या या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेऊन चौकशी अंती सोनावणे या हवालदाराला निलंबित केले आहे.