पंतप्रधान मोदी यांची इराण अध्यक्षांशी चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: रईसी यांना दूरध्वनी करुन त्यांच्याशी संवाद साधला. दहशतवाद्यांकडून होणारा हिंसाचार, तसेच युद्धामध्ये निरपराध नागरिकांचा बळी जाणे यांसारख्या घटना गंभीर असून त्या लवकरात लवकर आटोक्यात येणे आवश्यक आहे, या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले, अशी माहिती नंतर देण्यात आली.
हे युद्ध त्वरित थांबणे आवश्यक आहे. या भागात शांती आणि स्थिरता येणे आवश्यक असून मानवीय साहाय्यता अविरत मिळत राहिली पाहिजे. सर्व प्रश्नांवर परस्पर संवाद आणि सामोपचार यांच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करणे ही सध्याची निकड आहे, असेही प्रतिपादन या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
चर्चेचे महत्त्व अनन्यसाधारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इब्राहीम रईसी यांच्यातील ही चर्चा सध्याच्या परिस्थितीत अनन्यसाधारण महत्त्वाची आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. या युद्धात इराणचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी अप्रत्यक्षरित्या उत्तरदायित्व याच देशावर आहे, असे मानले जात आहे. पेलॅस्टाईन आणि इस्रायल या दोघांनीही भारताच्या समर्थनाची अपेक्षा केलेली आहे. त्यामुळे भारताकडे समन्वयकाची भूमिका आलेली आहे. भारताने हमासच्या दहशतवादाचा स्पष्ट शब्दांमध्ये निषेध केला असून, द्विराष्ट्रनिर्मिती हाच तोडगा असल्याचेही स्पष्ट केले आहे