तू मन हे मिचि करी। माझ्या भजनी प्रेम धरी। सर्वत्र नमस्कारि मज एकाते।
अध्याय नववा
दांभिक भक्ती बाप्पांना बिलकुल मान्य नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यांची नाटकं बाप्पा लगेच ओळखतात व त्या ठिकाणी क्षणभर सुद्धा न थांबता तेथून निघून जातात. अर्थात वरेण्यराजा त्यांचा महान भक्त होता म्हणून तर ते त्याला गणेशगीता सांगत आहेत. त्याला सांगण्याच्या निमित्ताने ते आपल्यालाही उपदेश करत आहेत. ते म्हणतात, मन आणि बुद्धी मला अर्पण करा.
भक्तांनं असं केलं की, काय चमत्कार होतो त्याचा आपण अभ्यास करू. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी इंद्रिये म्हणजे ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी आणि प्रभू ही एकापेक्षा एक वरचढ आहेत असा क्रम लावला आहे. त्यातील मन जर ईश्वराची भक्ती करू लागले की, त्याला आपोआप ज्ञानेंद्रिये दाखवत असलेल्या बाह्य गोष्टींविषयी वाटणारे आकर्षण संपुष्टात येईल पण मन हे असे सहजासहजी काबूत येत नाही. त्यासाठी त्याला बाह्य आकर्षणापेक्षा ईश्वरभक्ती श्रेष्ठ आहे याची खात्री पटायला हवी म्हणजे आपोआप विषयांचा त्याग घडतो. ईश्वरभक्तीचे श्रेष्ठत्व समजण्यासाठी बाह्य प्रापंचिक गोष्टी तात्पुरते समाधान देणाऱ्या असून चिरकाल टिकणाऱ्या नाहीत ही बाब मनावर पक्की ठसायला हवी. असं झालं की, समोर दिसणाऱ्या सर्व गोष्टी मिथ्या वाटू लागतात. त्या जरी समोर दिसत असल्या तरी तो त्यात मनाने गुंतत नाही. त्यातली आसक्ती संपल्यामुळे तो सतत ईश्वराचे गुणगान करू लागतो, त्याच्या लीला पदोपदी आठवत राहतो, त्यांच्या अवाढव्यतेविषयी, सर्वव्यापी स्वरूपाविषयी चिंतन करू लागतो. त्याचं मी म्हणजे हा देह हा जन्मजात समज नष्ट होऊन जातो. त्याचा अहंकार आपोआप गळून पडतो. माऊली एका ओवीतून हे सर्व सांगतात. भगवंत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, तू मन हे मिचि करी। माझ्या भजनी प्रेम धरी। सर्वत्र नमस्कारि मज एकाते । भगवंतांच्या उपदेशानुसार जो वागतो त्याला ज्या गोष्टी स्फुरतात त्याला प्रतिभा म्हणतात. जेव्हा भक्त अशी स्थिती अनुभवतो तेव्हा ईश्वराची स्तुती स्तोत्रं रचली जातात, कथा कीर्तनं केली जातात वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भागवत अशी महाकाव्य आपोआप स्फुरतात. हे सर्व वर्णन वाचून आपल्याही वाट्याला असे क्षण यावेत असं आपल्याला वाटू लागतं. अशा स्फुरणातूनच संतांनी वेदांच्या तत्वज्ञानास अनुसरून अभंग रचना केलेल्या आहेत. समर्थांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतलेले मारुतीरायांचे स्वरूप भीमरूपीतून आपल्या पुढे उभे केलेले आहे. कोटिच्या कोटि उ•ाणे, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे ।9।आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ।10। अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ।11। ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके । तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ।12। असं मारुतीरायांचं रूप सतत नजरेसमोर उभं ठाकलं की, श्रीरामांची चिंता दूर करणारे मारुतीराय आपल्या अडीअडचणीला नक्की धावून येतील अशी खात्री भक्ताला वाटते व तो निर्धास्त होऊन अधिक उत्कटतेने भक्ती करू लागतो. पुढेपुढे तर मारुतीराय सतत आपल्या बरोबर आहेत अशी खात्री वाटू लागते. म्हणून बाप्पा म्हणतायत, मन आणि बुद्धी ईश्वरचरणी अर्पण करा म्हणजे तुम्ही आपोआपच मला येऊन मिळाल, ह्या अर्थाचा अतो भक्त्या मयि मनो विधेहि बुद्धिमेव च । भक्त्या यजस्व मां राजंस्ततो मामेव यास्यसि ।। 10।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. बाप्पा म्हणतात, मन आणि बुद्धी तुम्ही माझ्या चरणी अर्पण केलीत की, तुम्ही स्वत:च्या विचाराने पुढे न जाता, माझ्या विचारानं पुढे जाऊ लागाल आणि माझं सगुण रूप होऊन जाल.
क्रमश: