वृक्षारोपण ही काळाची गरज
मराठा मंडळ कॉलेजमध्ये पर्यावरण दिन
प्रतिनिधी/ बेळगाव
तापमानातील वाढ ही वैश्विक समस्या निर्माण झाली आहे. झाडे लावणे हे यावरील रामबाण औषध आहे. त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून प्रत्येकाने जबाबदारीने वृक्षारोपण करावे व झाडांची काळजी घ्यावी, असे आवाहन निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी केले.
मराठा मंडळ संचालित आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि होम सायन्स महाविद्यालयातर्फे आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी उपस्थित होते. जमिनीची धूप होण्यापासून रोखणे, शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे निवृत्त प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे यांनी सांगितले.
सुरेश अरबिनहट्टी यांनी ‘हे विश्वची माझे घर’ याची माहिती दिली. ऋतुजा सप्ले हिने स्वागतगीत सादर केले. प्रा. जी. एम. कर्की यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वेदा शिवपुजीमठ यांनी आभार मानले.