शहरातील आस्थापनांवरील फलक जप्त
महानगरपालिकेच्या कारवाईने संताप
बेळगाव : शहरातील आस्थापनांवरील फलकांवर 60 टक्के कन्नड लिहिण्याचा आदेश आल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी त्याच कामामध्ये गुंतले आहेत. बापट गल्ली, पांगुळ गल्ली परिसरातील अनेक दुकानांवरील फलक काढून जप्त करण्यात आले. या प्रकारामुळे महानगरपालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभर जवळपास 400 फलक हटविण्यात आले आहेत. यामुळे व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मराठी भाषिक असलेल्या या शहरामध्ये कन्नडची सक्ती केली जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेकांना नोटिसा देऊन वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा परिणाम व्यवसायावर होणार आहे. शहरातील जनतेला विविध समस्या भेडसावत आहेत. त्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. महापालिकेच्या कारवाईमुळे व्यवसायांवर संक्रांत आली आहे. यामुळे जनतेतून महानगरपालिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून ज्या समस्या आहेत त्या प्रथम सोडवा आणि जनतेला सहकार्य करा, अशी मागणी होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये असलेले इंग्रजी व मराठी फलक काढून जप्त करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र व्यावसायिकांनी नोटीसनुसार कन्नड लिहिले नाही म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह विविध विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.