जबाबदारी-दक्षतेने कर्तव्य पार पाडा
दहावी परीक्षेतील पर्यवेक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : परीक्षेच्या तयारीसंदर्भात बैठक
बेळगाव : परीक्षेत अनियमितता, अनावश्यक गेंधळ व गैरसोय होणार नाही, यासाठी परीक्षा पर्यवेक्षकांनी सक्षम यंत्रणा निर्माण करून जबाबदारीने काम करावे. एसएसएलसी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या. शिक्षण विभागाच्यावतीने शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी एसएसएलसी वार्षिक परीक्षेच्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, 25 मार्च ते 6 एप्रिल या दरम्यान एसएसएलसी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन, कॅलक्युलेटर व इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास मनाई आहे. संबंधित परीक्षा केंद्रांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांची योग्य बैठक व्यवस्था करावी, त्यांना कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, यासाठी बसची व्यवस्था करावी. परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. परीक्षार्थी व नियुक्त केलेले शिक्षक, अधिकारी या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देऊ नये. परीक्षा केंद्रांभोवती 200 मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. सर्व अधिकाऱ्यांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिक्षक व परीक्षा कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करावे, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी केल्या. जिल्हाशिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य एस. डी. गंजी यांच्यासह समन्वय अधिकारी व केंद्र अधीक्षक उपस्थित होते.