रस्त्यांवर पायी चालणाऱ्यांना दुर्घटनेचा सर्वाधिक धोका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
रस्ते दुर्घटनांमध्ये पायी चालणारे व्यक्ती सर्वाधिक असुरक्षित असतात. भारतात सुमारे 32 हजार पायी चालणारे व्यक्ती रस्ते दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी गुरुवारी ही माहिती मांडत रस्त्यावर पायी चालणाऱ्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटनांपैकी 58 टक्के दुर्घटना पायी चालणाऱ्यांसोबत घडत आहेत. भारतातील दुर्घटनांचा हा आकडा पाहिल्यास सुमारे 32,825 पायी चालणाले लोक दुर्घटनांचे शिकार ठरले असल्याचे सिन्हा यांनी म्हटले. अशाप्रकारच्या दुर्घटना जगभरात होत आहेत. पूर्ण जगात 1.2 दशलक्ष दुर्घटना घडतात. अमेरिकेत 2022 मध्ये 7500 दुर्घटना झाल्या. अमेरिकेत झालेल्या या रस्ते दुर्घटना 2010 च्या तुलनेत 77 टक्क्यांची वृद्धी दर्शवितात. भारतात देखील अशाप्रकारच्या रस्ते दुर्घटनांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. पायी चालणाऱ्या लोकांचा एक नैसर्गिक आणि मूलभूत अधिकार असतो. नव्या विकासकामांमुळे ही रचना बदलत असते. उपलब्ध माहितीनुसार पायी चालणाऱ्या लोकांमध्ये 31 टक्के जण व्यावसायिक कारणांमुळे पायी चालत असतात. याचमुळे पायी चालणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची मागणी करत असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.
लोकांची सुरक्षा आमचे कर्तव्य
जेथे रस्त्याचे रुंदीकरण किंवा विस्तारीकरण केले जाते, तेथील स्थानिकता सुरक्षित ठेवण्यात यावी. म्हणजेच जे स्थानिक लोक पायी चालतात, ते पारंपरिक पद्धतींने प्रवास करतात, बैलगाडी, घोडागाडी, टमटमचा वापर करतात. यामुळे त्यांची सुरक्षा आणि अधिकारांचे रक्षण आमचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय महामार्ग मोठमोठ्या शहरांना जोडत असल्याने स्थानिक लोकांना असुरक्षित वाटू दिले जाऊ नये अशी सूचना सिन्हा यांनी केली आहे.