ब्लॅकआऊटमुळे पंजाब-दिल्ली सामना रद्द
उर्वरित आयपीएल रद्द होण्याचा धोका
वृत्तसंस्था/धरमशाला
पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएलमधील सामना अर्ध्यावरच रद्द करण्यात आला. शेजारील जम्मू व पठाणकोट शहरात स्फोटानंतर हाय अलर्ट जारी केल्यावर फ्लडलाईट्स बंद करण्यात आले. भारत-पाक यांच्यात युद्ध सुरू असून या घडामोडीमुळे आयपीएल स्पर्धेचा उर्वरित भाग रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खेळ थांबवण्यात आला तेव्हा पंजाबने 10.1 षटकांत 1 बाद 122 धावा जमविल्या होत्या. पावसामुळे हा सामना उशिराने सुरू करण्यात आला होता. फ्लडलाईट्समध्ये बिघाड झाल्यामुळे सामना थांबवण्यात आल्याचे प्रथम सांगण्यात आले. जम्मू व पठाणकोट येथे स्फोटाचे आवाज आल्यानंतर धरमाशालामध्येही ब्लॅकआऊट करण्यात आले होते.
या सामन्यासाठी सुमारे 23000 प्रेक्षक उपस्थित होते. त्या सर्वांना सुरक्षितपणे स्टेडियमबाहेर काढण्यात आले. नंतर खेळाडूंनाही सुरक्षितपणे नेण्यात आले. स्टेडियम रिकामी करताना प्रेक्षकांत कोणतेही गोंधळाचे व भीतीचे वातावरण नव्हते. दक्षतापूर्वत त्यांना व खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, असे एचपीसीएच्या सूत्रांनी सांगितले. खेळ थांबवण्यात आला तेव्हा प्रभसिमरन सिंग 28 चेंडूत 50 धावांवर खेळत होता तर प्रियांश आर्यने 34 चेंडूत 70 धावा फटकावल्या होत्या. टी. नटराजनने त्याला बाद केल्यानंतर प्रकाशझोत बंद करण्यात आला. हा सामना रद्द झाल्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. लीगमध्ये सहभागी असणाऱ्या विदेशी खेळाडूंनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्याने बीसीसीआयने विचारविनिमय करण्यासाठी तातडीने बैठक सुरू केली असल्याचे समजते.