पवन कल्याण यांच्या पक्षाला मान्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आंध्र प्रदेशातील नेते पवन कल्याण यांच्या जनसेना या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे. तसेच या पक्षाला आता चिन्हही प्रदान करण्यात आले आहे. या पक्षाला आंध्र प्रदेशातील प्रादेशिक पक्ष म्हणून ओळख मिळाली आहे. पाण्याचा काचेचा पेला हे चिन्ह आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाने या पक्षाच्या मान्यनेवर आपली मुद्रा उमटविली. विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाला सहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते पडतात आणि ज्या पक्षाचे कमीत कमी दोन आमदार निवडून येतात, त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्याचा नियम आहे. 2024 मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसेना पक्षाला 6.87 मते आणि 21 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचीत या पक्षाचा समावेश आता प्रादेशिक पक्ष म्हणून करण्यात आल्याची माहिती पवन कल्याण यांनी दिली.
2024 मध्ये स्थापना
जनसेना या पक्षाची स्थापना पवन कल्याण यांनी 2024 मध्ये केली होती. त्यानंतर 10 वर्षांनी हा पक्ष मान्यताप्राप्त झाला आहे. काचेचा पेला हे चिन्ह या पक्षाला स्थायी स्वरुपात देण्यात आले आहे. त्यामुळे या चिन्हावर या पक्षाचे उमेदवार आंध्र प्रदेशात निवडणुकीत सहभागी होऊ शकतात. 10 वर्षांपूर्वी या पक्षाची नोंद केवळ आंध्र प्रदेशातील राजकीय पक्ष अशी करण्यात आली होती. आता मात्र, तो मान्यताप्राप्त राजकीय पक्ष बनला आहे.
युती करुन विजयी
जनसेना पक्षाने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशम या पक्षाशी आणि भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. या युतीचा लाभ या पक्षाला झाला. 21 जागांवर विजय मिळाला. आतापर्यंतच्या या पक्षाला मिळालेल्या या सर्वाधिक जागा आहेत. लोकसभा निवडणुकीतही या पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. हा पक्ष केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात सत्तेवर असणाऱ्या सरकारमध्ये या पक्षाचे मंत्रीही आहेत. पवन कल्याण उपमुख्यमंत्री आहेत.