पटनाईक 4 जूनला होतील ‘माजी’ !
ओडीशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसमवेत विधानसभेची निवडणूकही होत आहे. 4 जूनला मतगणना झाल्यानंतर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे ‘माजी मुख्यमंत्री’ होणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. ओडीशा विधानसभेच्या 147 जागा असून भारतीय जनता पक्ष त्यांच्यापैकी 75 हून अधिक जागा निश्चित जिंकणार आहे. त्यामुळे पटनाईक यांची जाण्याची वेळ आली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शहा यांनी मंगळवारी ओडीशात चांदबाली येथे प्रचार सभेत पटनाईक यांच्या सरकारवर टीका केली. गेली जवळपास 25 वर्षे या राज्यात पटनाईक यांचे सरकार आहे. मात्र, राज्याचा विकास झालेला नाही. आजही हे राज्य भारतातील गरीब राज्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. भारतीय जनता पक्षाच्या हाती जर राज्य सरकार आले तर झपाट्याने विकास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जाजपूर येथेही सभा
शहा यांनी राज्यातील जाजपूर लोकसभा मतदारसंघातही प्रचार सभेत भाषण केले. विकासाच्या मुद्द्यांसमवेत त्यांनी आंतरराष्ट्रीय मुद्देही उपस्थित केले. काँग्रेस किंवा कोणताही विरोधी पक्ष पाकव्याप्त काश्मीरच्या संदर्भात एक ब्र ही तोंडातून बाहेर काढत नाही. कारण विरोधी पक्ष पाकिस्तानला घाबरतात. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग होता, आहे आणि राहील, या प्रतिपादनाचा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे ‘चावलवाले सरकार’ आहे, तर पटनाईक यांचे सरकार ‘झोलेवाली सरकार’ आहे, असा टोला त्यांनी लगावला.