एका मेसेजमुळे प्रवाशांना वंदे भारत चुकली
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
बेंगळूरहून बेळगावला येणाऱ्या वंदे भारतच्या प्रवाशांना एका मेसेजच्या गोंधळामुळे रेल्वे चुकल्याची घटना शुक्रवारी बेंगळूर येथे घडली. यामुळे बेळगावला येणारे अनेक प्रवासी रेल्वे स्थानकातच राहिले. याचा जाब नैत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारत प्रवाशांनीरोष व्यक्त केला.
दुपारी 2.20 मिनिटांनी रेल्वे बेंगळूरमधून बेळगावच्या दिशेने रवाना होते. शुक्रवारी प्रवाशांच्या मोबाईलवर रेल्वे सायंकाळी 5.30 वाजता निघेल, असा मेसेज नैत्य रेल्वेकडून पाठविण्यात आला. सध्या तिपतूर रेल्वे स्थानकात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बऱ्याच एक्स्प्रेस उशिराने जात असल्याने रेल्वेला विलंब झाला असावा, अशी प्रवाशांची धारणा झाली.
सायंकाळी 4 वाजता बेंगळूर रेल्वे स्थानकात प्रवासी दाखल झाल्यानंतर वंदे भारत नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ चौकशी केली असता रोजच्या वेळेप्रमाणेच दुपारी 2.20 ला रेल्वे बेळगावच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी स्टेशन व्यवस्थापकांना जाब विचारला. यावेळी एकदोन नव्हे तर अनेक प्रवाशांना वंदे भारत चुकली.
नैत्य रेल्वेने आपल्या यंत्रणेत सुधारणा करावी
रेल्वेची प्रवाशांना मेसेज देणारी यंत्रणा हॅक झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु यामुळे प्रवाशांनी मात्र आपला संताप व्यक्त केला. अनेकांना आपले पुढील प्लॅन रद्द करावे लागले. त्यामुळे नैत्य रेल्वेने आपल्या यंत्रणेत सुधारणा करावी, अशी मागणी प्रवाशांतून करण्यात आली.