For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकांनाच ‘शहाणे’ करण्याची आवश्यकता

06:37 AM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
पालकांनाच ‘शहाणे’ करण्याची आवश्यकता
Advertisement

आटपाडी येथे एक शिक्षक असलेला बाप आपल्या बारावीत शिकणाऱ्या मुलीला खासगी शिकवणीच्या सराव परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून इतकी बेदम मारहाण करतो की त्यात त्या मुलीचा जीव जातो. मन सुन्न करणारी ही घटना शिक्षण क्षेत्रांत चाललेल्या गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेत आजची मुले कशी होरपळली जात आहेत हेच दर्शवते. पालक ह्या जीवघेण्या स्पर्धेत आपल्या मुलांना जुंपताना धन्यता मानताना दिसतात.

Advertisement

मुलांना ‘एटीएम’ समजणारी आजची पालकांची जमात मुलांवर त्यांच्या क्षमतांचा विचार न करताच आपली स्वप्ने लादताना दिसते. विद्यार्थ्यांवर  अभ्यासाचा ताण खूपच वाढला आहे. करिअरसाठी चालणारी गुणांची स्पर्धा अत्यंत जीवघेणी झाली आहे, मुलांची आवड प्राधान्याने लक्षात घेतली जाणे आवश्यक आहे. चोवीस तास घाण्याच्या बैलासारखी त्याची स्थिती दिसून येते. सतत यशस्वी  होण्याचा ताण आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. आज प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विचार न करताच पालक ठरवतात तेथे विद्यार्थी निमूटपणे शिकताना दिसतो.

अभियांत्रिकी वा वैद्यकीय मागे धावणे यालाच करिअर म्हटले  जाऊ लागले आहे. करिअर म्हणजे काय आणि त्याचा नेमका उद्देश काय ह्याचा मागसुमही ह्या निर्णयात नसतो. करिअरचे क्षेत्र खूपच विस्तारले आहे. याबाबत सर्व प्रथम पालकांनाच शहाणे करण्याची नितांत गरज आहे. आटपाडीची घटना ही पालकाच्या अमानुषतेचे टोक आहे. पालकांचीच ‘शिकवणी’ घेऊन या वर्गाला ‘करिअर’ सज्ञान करण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांना जीवघेण्या करिअरच्या स्पर्धेत ढकलणारे पालकच तर याला जबाबदार आहेत. त्यातही मुलांच्या करियरचे सर्व निर्णय मुलांचा कल लक्षांत न घेताच पालकच घेत असतात. आपण आयुष्यात जे साध्य करू शकलो नाही ते मुलांनी करावे असा एकंदरीत आवेश अशा निर्णयात दिसून येतो. भारतात विद्यार्थी आत्महत्या खूप वाढल्या आहेत. मानसिक स्तिथीचा समतोल राखू न शकल्याने तसेच कुटुंबाच्या  अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने वैफल्यग्रस्थ होऊन आत्महत्या केल्याच्या घटनेत  वाढ दिसून आली आहे.

Advertisement

प्रत्येक 42 मिनिटाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो आहे. तर प्रत्येक दिवसागणिक 34 विद्यार्थी आत्महत्या करताना दिसतात. तरीही ही गंभीर समस्या आहे असे सरकारला किंवा उच्च शिक्षण क्षेत्राला वाटते का? करिअरसाठी चालणारी गुणांची स्पर्धा अत्यंत जीवघेणी झाली आहे, मुलांची आवड प्राधान्याने लक्षात घेतली जाणे आवश्यक आहे.

आपला नेमका कल काय आहे ह्या बाबतीत बहुसंख्य विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. करिअरचा प्रवास कसा करायचा आहे आणि त्याचा नेमका उद्देशच ठाऊक नसेल तर उत्तम करिअर  घडणार कसे?

-प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर

Advertisement
Tags :

.