रायगाव येथे बालक पालक मेळावा
आनेवाडी :
'खेळणी नको खेळ हवा' हे ब्रीदवाक्य घेऊन अंगणवाडीच्या सेविकांनी, आपल्या मुलांचे भविष्य घडविणारे भविष्याचे झाड, गरोदर माता आहार, झोळीचा पाळणा, विविध प्रकारच्या टोप्या, मुखवटे आरसा, घरगुती वाद्य, हिरकणी कक्ष, जादुई पिशवी, पौष्टिक आहार, जादूचा बोगदा, सापशिडी, कागदाचा पाऊस असे अनेक प्रकारचे स्टॉ ल उभारून तसेच मुलांचे पूजन करून आई-वडिलांचेही मुलांकडून पूजन करून घेऊन भावनिक वातावरणात मातृपूजनाने अंगणवाडीताईंनी ते ३ वयोगटातील बालचमू गरोदर व स्तनदामाता यांच्यासाठी भरवलेल्या आरंभ बालक पालक मेळाव्याने उपस्थित गहिवले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प जावळी अंतर्गत रायगाव येथे सायगाव, दरे, हातगेघर, करहर या बिटच्या अंगवाडीताईनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात खऱ्या अर्थाने जुन्या खेळासोबत जुने आहार, संस्कार याचे धडे घेत पालकांनी या मेळाव्यास भरभरून प्रतिसाद दिला. प्रमुख पाहुणे म्हणून जावली पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री गिरी, बालविकास प्रकल्प अधिकारी शैला खामकर, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव संदीप सावंत, आशा गटप्रवर्तक सारिका गुजर, ग्रामसेवक तालुकाध्यक्ष रजनीकांत गायकवाड, सरपंच हसीना मुजावर, दुर्गा भिसे, बाळासाहेब कांबळे, राऊत, सुहास भोसले, अनिता गायकवाड व विभागातील सरपंच, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागातील बीट पर्यवेक्षिका बी. ए. कारंडे, पी. डी. कठाळे, एस. एस. सावंत यांनी नियोजन केले. प्रकल्प अधिकारी शैला खामकर म्हणाल्या, बाळाच्या उत्तम पोषणाची जबाबदारी ही फक्त आईची नाही तर घरातील सर्वांनी ती जबाबदारी घेतली पाहिजेत, तरच बालक सुदृढ होऊ शकते. जयश्री गिरी यांनी कोरोना काळात सेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे, तर आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित केल्याने कौतुक केले. संदीप सावंत, प्रशांत गुजर, अनिता गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी दीप्रज्वलन करून जयश्री गिरी व शैला खामकर यांनी अंगणवाडीताईनी उभारलेल्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घेतली. योगवेदंत सेवा समिती साताराचे संजय महाडिक व गोरे यांनी सर्व माता व मुलांच्या उपस्थितीत माता-पिता पूजन कार्यक्रम घेतला. रायगावचे उपसरपंच समाधान गायकवाड व अनिता गायकवाड, युवा नेते इंद्रजित भिलारे यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले. सूत्रसंचालन पूनम देशमुख यांनी केले.
- मदतीचे आश्वासन
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माता पालक व अंगणवाडीताई मदतनीस यांना या विभागातील सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित भिलारे यांनी भोजन देऊन त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमास जी काही मदत करता येईल ती महाराष्ट्र शेतकरी सैनिक वेलफेर संघटनेच्या माध्यमातून करू असे सांगितले.