Vari Pandharichi 2025: पंढरीची वारी चित्रपटाचे चित्रीकरण 4 वर्षे रखडले, काय होते कारण?
पंढरीची वारी हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : काही वर्षापूर्वी आषाढी वारी आणि पौराणिक चित्रपट असे एक समीकरणच होते. त्याकाळी पंढरपुरातील चारही टॉकीजमध्ये पौराणिक, धार्मिक कथानक असलेले सिनेमे येत. पंढरीची वारी हा मराठी चित्रपट आणि आषाढी वारी हा एक सुवर्ण योगायोग आहे. याचे कारण म्हणजे हा पूर्ण सिनेमा आळंदी ते पंढरपूर या वारीतील प्रवासावर आधारित होता.
पंढरीची वारी हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून प्रत्येक आषाढी वारीमध्ये गावातील चार टॉकीज पैकी कुठे ना कुठे हा लागायचा. नावच पंढरीची वारी, असल्याने अनेक भाविक हा चित्रपट पाहत असत. अगदी 2000 सालापर्यंत हा सिलसिला सुरू होता, पुढे मल्टिप्लेक्सची क्रेझ आल्याने राज्यातील एक पडदा चित्रपटगृहे हळूहळू बंद पडू लागली.
त्यात पंढरपूर येथीलही सिंगल क्रीन टॉकीज बंद पडली. त्यामुळे आता पंढरीची वारी, फक्त टिव्हीवर कधीमध्ये दिसतो. पंढरीची वारी या चित्रपटाचे शुटिंग पुणे ते पंढरपूर या पालखीमार्गावर करण्यात आले. आधी या चित्रपटात रंजना आणि अरुण सरनाईक हे काम करणार होते.
एका कार अपघातात अरुण सरनाईक ठार झाले, तर अभिनेत्री रंजना जबर जखमी झाल्या. त्या बऱ्या होण्याची वाट दिग्दर्शकांनी पाहिली, मात्र कंबरेपासून त्यांचे शरीर निकामी झाल्याने त्यांना व्हीलचेअर लागत असे. हताश होऊन लीड रोलसाठी बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांना घेतले. तर पुन्हा अशोक सराफ यांनाही घेण्यात आले.
अनेक अडचणी आल्याने चार वर्षे चित्रीकरण रखडले होते. 1980 आणि 90 च्या दशकात वारी काळात पंढरीत केवळ पौराणिक कथा देवाधिकांचे सिनेमे थिएटरला लागत. अष्टलक्ष्मी, संपूर्ण रामायण, माया बाजार, जय संतोषी माँ, असे सिनेमे येत. आजही चॅनेल वर कुठे ना कुठे, वारी काळात, पंढरीची वारी, हा चित्रपट प्रदर्शित होत होता.