पालकरवाडी सरपंच , ग्रामस्थांचे उद्या उपोषण
वेंगुर्ले । प्रतिनिधी
पालकरवाडी (तालुका वेंगुर्ला) गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या तक्रारीबाबत १ मे रोजी पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी ,जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की , पालकरवाडी गावामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मौजे पालकरवाडी नळपाणी योजना दुरुस्ती करणे या नावाने ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत नळ योजनेचे काम सुरू आहे. सदर कामाची अंदाजपत्रकीय रक्कम रुपये 2 कोटी 42 लाख 90 हजार 600 असून निविदा रक्कम रुपये 79 लाख 31 हजार 278 अशी आहे. ग्रामपंचायत पालकरवाडी कार्यक्षेत्रामध्ये पूर्वीची जीवन प्राधिकरणमार्फत झालेली नळ योजना सन 2010 पासून बंद आहे. सदर योजनेची पाणी साठवण टाकी, पाण्याचे स्त्रोत हे पूर्णतः वापरा अयोग्य झाले असल्यामुळे ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत वाडी निहाय नळयोजना मागणी करण्यात आली होती. परंतु पाणीपुरवठा विभागामार्फत पालकरवाडी नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे असे काम कसे मंजूर केले हा मोठा प्रश्न आहे. कारण सध्य स्थितीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू कामांसाठी वापरात आणलेले सर्व पाण्याचे स्त्रोत हे नवीन आहेत. पाणी साठवण टाकीचे बांधकाम, पाईपलाईन आधी सर्व उपांगे नवीन आहेत त्यामुळे पालकरवाडी नळ योजना दुरुस्ती काम कसे घेतले याचा खुलासा पाणीपुरवठा विभागाने करावा. यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत कामासाठी आदित्य अरुण वराडकर याची मक्तेदार म्हणून निवड करण्यात आली. मक्तेदार यांनी कार्यारंभ आदेश मधील पाणी उपलब्धतेची खात्री केल्याशिवाय इतर कामे करू नयेत असे स्पष्ट आदेश आहेत. तरीही संबंधित मक्तेदार व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या टाकीचे बांधकाम पाईपलाईन वैयक्तिक नळ कनेक्शनची कामे कोणत्या आधारे केली याचा खुलासा करावा. याबाबत संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून सदर योजनेतील कामांमधील त्रुटी व उणिवा दाखवून देण्यात आल्या. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ मारून थातूरमातूर उत्तरे ग्रामपंचायतीला दिलेली आहेत. संबंधित मक्तेदारांची बिले मंजूर करताना संबंधित ग्रामपंचायतीला सदर काम पूर्ण आहे का ? याबाबत विचारणा केली नाही. ग्रामपंचायतीने आतापर्यंत दिलेल्या पत्रांना संबंधित ग्रामीण पुरवठा विभागाने गांभीर्याने न घेता फक्त पुरवणी आराखडा करून नळ योजना सुरळीत करू अशी उत्तरे दिली जातात. सध्या पालकरवाडी गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दारात जलजीवन योजनेचा नळ आहे मात्र नळाला पाणी नाही. अशी परिस्थिती गावात आहे गावातील जलजीवन योजनेची कामे अपूर्ण आहेत की तात्काळ पूर्ण करून गावातील पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराविरोधात १ मे रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार असा इशारा सरपंच बंड्या पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी दिला आहे.