For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅलेस्टाइनच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींना साद

06:53 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
पॅलेस्टाइनच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींना साद
Advertisement

इस्रायलचे मनपरिवर्तन करण्याची पत्राद्वारे विनंती

Advertisement

वृत्तसंस्था/ गाझापट्टी

पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी गाझामधील युद्ध रोखण्यासाठी भारत सरकारकडून समर्थन मागितले आहे. भारतातील पॅलेस्टाइनचे राजदूत अब्दुल्ला एम. अबू शावेश यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. महमूद अब्बास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गाझामधील बिघडत्या मानवीय स्थितीप्रकरणी समर्थन मागितले आहे. नरेंद्र मोदींनी इस्रायलवर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी इस्रायल सरकारसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांचा वापर करावा असे आवाहन अब्बास यांनी पत्रात केले आहे.

Advertisement

भारत नेहमीच पॅलेस्टाइनच्या हितांचा समर्थक राहिला आहे. गाझामधील सद्यस्थिती अत्यंत दयनीय आहे. गाझामध्ये उपासमारीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने गाझामध्ये केवळ बॉम्बवर्षाव केला नसून उपासमारीला युद्धाचे अस्त्र केले आहे. गाझामध्ये अन्नधान्याचा पुरवठा रोखत इस्रायलने स्थिती भयावह केल्याचा दावा राजदूत शावेश यांनी केला.

भारत संयुक्त राष्ट्रसंघ, मानवाधिकार परिषद आणि अनेक आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय व्यासपीठांवर पॅलेस्टाइनचा मजबूत समर्थक राहिला आहे. पॅलेस्टाइन दयनीय स्थितीला सामोरा जात असताना भारताकडे आशेने पाहत आहे, कारण भारताचा राजनयिक प्रभाव अत्यंत अधिक आहे. गाझासाठी अधिक प्रयत्न भारत करेल अशी अपेक्षा आहे. पॅलेस्टाइनचा निधी रोखू नये अशी सूचना भारत इस्रायलला करेल अशी अपेक्षा आम्ही करतो. इस्रायलने तीन महिन्यांपासून पॅलेस्टाइनसाठीचा मदतनिधी रोखला आहे. ही रक्कम सुमारे 2 अब्ज डॉलर्सची असून ती उपलब्ध करण्याची सूचना इस्रायलला करण्यात यावी असे शावेश यांनी म्हटले आहे.

भारताचा मोठा प्रभाव

भारत एक मोठा देश असून त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे स्थान आहे. भारत हा ब्रिक्सच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. याचमुळे पॅलेस्टिनी लोकांच्या हिताकरता भारत स्वत:च्या राजनयिक प्रभाव वापर करेल अशी अपेक्षा आम्ही करत आहोत. भारताने पॅलेस्टिनी क्षेत्र आणि गाझामध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. गाझामध्ये जवाहरलाल नेहरू वाचनालय आणि अनेक मूलभूत सुविधांची निर्मिती भारताच्या मदतीने करण्यात आली होती. या सुविधा इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्या आहेत. परंतु काही क्षेत्रांमध्ये भारतीय प्रकल्प अद्याप सुरू असून यात पश्चिम किनाऱ्याच्या उत्तरेकडील एक रुग्णालय सामील असल्याचे शावेश यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.