पाकिस्तानकडून युएन व्यासपीठाचा राजकीय वापर
भारताने सुनावले : संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानची पोलखोल
वृत्तसंस्था, संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा सह-अध्यक्ष म्हणून पाकिस्तान स्वत:च्या पदाचा गैरवापर करतोय आणि निष्पक्ष राहण्याऐवजी याचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप भारताने केला आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरिश यांनी सुरक्षा परिषदेच्या एका अनौपचारिक बैठकीत पाकिस्तानला सुनावले आहे.
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. एक सह-अध्यक्ष म्हणून ज्याच्याकडून संतुलित आणि निष्पक्ष वर्तनाची अपेक्षा केली जातेय, तो या व्यासपीठाचे राजकीयकरण करू पाहतोय अशी टीका हरिश यांनी पाकिस्तनावर केली आहे.
काश्मीरचा मुद्दा उपस्थित
या बैठकीचा विषय ‘सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय शांतता सतेच सुरक्षेची देखभाल“ होता. या बैठकीचे आयोजन चीन आणि पाकिस्तानकडून संयुक्त स्वरुपात करण्यात आले होते. याचे सह-अध्यक्षत्व संबंधित देशांच्या राजदूतांनी केले आहे. पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी या बैठकीत काश्मीर मुद्दा उपस्थित केला.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दडपशाही
सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाची अवहेलना करत पाकिस्तानने अवैध कब्जा जारी ठेवला आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोक पाकिस्तानच्या दडपशाहीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. पाकिस्तानचे सैन्य या आंदोलकांना निर्दयीपणे चिरडू पाहत असल्याचे भारताच्या प्रतिनिधीने सुरक्षा परिषदेच्या निदर्शनास आणून दिले आहे.
अरिया बैठक
तर सुरक्षा परिषदेत मंगळवारी पार पडलेली बैठक ही अरिया फॉर्म्युल्याची होती. बैठक सुरक्षा परिषदेकडून अनौपचारिक स्वरुपात आयोजित केली जाते, ज्यात इच्छुक राष्ट्र, अधिकारी, संघटना आणि व्यक्तींची भागीदारी असते. या बैठकीचे नाव व्हेनेझुएलाचे मुत्सद्दी डिएगो अरिया यांच्यावर नावावर ठेवण्यात आले आहे. अरिया यांनीच सुरक्षा परिषदेच्या नियबद्ध प्रक्रिया आणि नेतृत्वाला दूर ठेवण्यासाठी हे प्रारुप सादर केले होते.