पाकिस्तानची आखाती देशांकडे याचना
भारताच्या कारवाईनंतर विविध देशांचे समर्थन मिळविण्याचे प्रयत्न
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारताकडून सुरू झालेल्या कारवाईनंतर पाकिस्तान चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. इतर मित्रदेशांची साथ मिळवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची धडपड सुरू आहे. शरीफ यांनी नुकतीच आखाती देशांच्या राजदूतांची भेट घेत त्यांचा पाठिंबा मागितला आहे. शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबिया, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) राजदूतांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. या चर्चेवेळी पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला. शाहबाज यांनी सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांना तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचे आवाहन केल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी चीनचे राजदूत झेडोंग यांचीही भेट घेतली. शुक्रवारी चीनचे राजदूत जियांग झिडोंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर दोघांमध्ये चर्चा झाली. चिनी राजदूतांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे परस्पर मतभेद सोडवण्याचे आवाहन केले. शाहबाज शरीफ यांनी चीनच्या भूमिकेचे कौतुक करत दक्षिण आशियात शांतता राखण्यासाठी पाकिस्तान सर्व पक्षांसोबत एकत्र काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून चर्चा करताना त्यांना परिस्थितीची माहिती दिली होती.