पाकिस्तानचा इतिहास नरसंहाराचा
भारताने काढली खरडपट्टी : अफगाणिस्तान-बांगलादेशचा उल्लेख
वृत्तसंस्था/संयुक्त राष्ट्रसंघ
भारताने पाकिस्तानच्या ‘नरसंहाराच्या कलंकित इतिहासा’वर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे अमानवीय वर्तन दशकांपासून स्वत:च्या अंतर्गत अपयशांना हिंसक कृत्यांद्वारे जगावर लादण्याच्या त्याच्या प्रयत्नांना दर्शविते, असा शाब्दिक हल्लाबोल भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनेनी यांनी चढविला आहे. पाकिस्तान स्वत:च्या नरसंहाराच्या कलंकित इतिहासासोबत अशा मुद्द्यांचा उल्लेख करतो, जे भारतासाठी पूर्णपणे अंतर्गत विषय आहेत, अशी टिप्पणी पर्वतनेनी यांनी केली आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून चर्चेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यावर पर्वतनेनी यांनी ही भूमिका मांडली आहे.
अफगाणिस्तानवरील हल्ला
पर्वतनेनी यांनी चालू वर्षाच्या प्रारंभी अफगाणिस्तानवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा उल्लेख केला. रमजानच्या पवित्र काळात पाकिस्तानने काबूलमध्ये रुग्णालयावर क्रूर हवाई हल्ला केला होता हे जग विसरलेले नाही. हिंसेचे हे भ्याड अन् अनैतिक कृत्य एका रुग्णालयात 269 नागरिकांच्या मृत्युचे कारण ठरल्याचे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.
पाकिस्तानची ढोंगीपणा
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांच्या पालनाचा दावा करतो, तसेच अंधारात निर्दोष नागरिकांना लक्ष्य करतो. मशिदीतून नमाजानंतर लोक बाहेर पडत असताना पाकिस्तानने हवाई हल्ला केला होता अशी टीका पर्वतनेनी यांनी केली.
स्वत:च्या लोकांवर बॉम्बवर्षाव
पाकिस्तानकडून अशाप्रकारचे क्रूरकृत्य होणे आश्चर्यकारक नाही, पाकिस्तान स्वत:च्या लोकांवर बॉम्बवर्षाव करते. पाकिस्तानने 1971 च्या ऑपरेशन सर्चलाइट दरम्यान स्वत:च्या सैन्याकडून 4 लाख महिलांच्या नरसंहार आणि बलात्कार अभियानाला मंजुरी दिली होती. ऑपरेशन सर्चलाइट हे 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) बांगलादेशी राष्ट्रवादी आंदोलनाच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचे हे कोडनेम होते, असे पर्वतनेनी यांनी युएनच्या निदर्शनास आणून दिले आहे.