पाकिस्तानचा सायबर हल्ला अयशस्वी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशा स्थितीत पाकिस्तानच्या सायबर गुन्हेगारांनी भारतावर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न चालविला असून भारताच्या संगणक तज्ञांनी या युद्धातही पाकिस्तानला धूळ चारल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे जवळपास 75 सायबर हल्ले भारताच्या सायबर सुरक्षा कक्षाकडून उधळण्यात आले आहेत. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या ‘सायबर ग्रूप एचओएएस1337’ या गटाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो यशस्वी झाला असता तर भारताची सायबर हानी होण्याची शक्यता होती. तथापि, हा हल्ला होत असल्याचे दिसून येताच, भारताच्या सायबर सुरक्षा तज्ञांनी वेळीच योग्य ती उपाययोजना करत हा हल्ला भारताच्या संगणकव्यवस्थेच्या जाळ्यापर्यंत पोहचू दिला नाही. त्यामुळे भारताच्या संगणकव्यवहारांवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. आतापर्यंत पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व सायबर हल्ले परतविण्यात भारत यशस्वी ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. भारताने आपल्या सर्व सायबर सुरक्षा कक्षांना रात्रंदिवस सज्ज राहण्याची सूचना केली आहे.