For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानचा कबुलीनामा

06:55 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानचा कबुलीनामा
Advertisement

► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद, नवी दिल्ली

Advertisement

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा तणाव वाढला असतानाच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानने दहशतवादाला पोसल्याची कबुली त्यांनी दिली. यापूर्वी पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनीही अशाच पद्धतीचे वक्तव्य केले होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे भारताला प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे.

दहशतवादाच्या मुद्द्यावर बिलावल भुट्टो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक बाबींवर भाष्य केले. संरक्षणमंत्र्यांनी आतापर्यंत दहशतवादाबाबत जे काही भाष्य पेले ते मला गुपित वाटत नाही. पाकिस्तानचा स्वत:चा भूतकाळ आहे. याचा परिणाम असा झाला की आपल्याला बरेच काही सहन करावे लागले. आपण स्वत: यातून धडा घेतला आहे. हे सुधारण्यासाठी आपल्याला एका प्रक्रियेतून जावे लागेल,’ असे भुट्टो म्हणाले. यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानने ‘घाणेरडे काम’ (डर्टी वर्क) केल्याचे वक्तव्य जाहीरपणे कले होते. पाकिस्तान गेल्या 30 वर्षांपासून दहशतवाद्यांना निधी देत आहे. बिलावल यांनी आसिफ यांच्या विधानाचे समर्थन करत पाकिस्तानला त्यांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागले, असा दावा केला.

Advertisement

हल्लेखोर अजूनही भारतीय हद्दीत?

पहलगाम हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयए आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पोहोचली आहे. याचदरम्यान गुप्तचर सूत्रांनी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपल्याचा संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोरांकडे रेशन-पाणी असल्यामुळे ते या डोंगराळ भागात बराच काळ राहू शकतात, असे मानले जात आहे. त्यांच्या शोधासाठी भारतीय तपास यंत्रणांकडून गेल्या आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश आलेले नाही. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानचा 9 नागरिकांना परत घेण्यास नकार

अटारी सीमेवर पोहोचलेल्या 9 नागरिकांना परत घेण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नकार दिला. भारत सरकारच्या आदेशानंतर हे लोक पाकिस्तानात परत जाण्यासाठी अटारी सीमेवर पोहोचले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी याचे कारण सांगितलेले नाही. भारताने पाकिस्तानी नागरिकांना माघारी परतण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये अनेक लोक अटारी आणि वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले आहेत.

सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सलग आठव्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या जम्मू काश्मीरच्या पाच भागातही युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने अन्य ठिकाणी छुपे बंकर तयार करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हद्दीतून गोळीबार वाढल्यास नव्या बंकर्सचा वापर केला जाऊ शकतो. पाकिस्तानसोबत तणाव दिवसेंदिवस वाढत असून फिरोजपूरच्या सीमावर्ती गावांमधील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. तसेच पाकिस्तानी हद्दीतील सीमावर्ती भागातील लोकही सुरक्षित ठिकाणी आपल्या साहित्यासह रवाना होत असल्याचे सॅटेलाईट दृश्यांमध्ये दिसून आले आहे.

Advertisement
Tags :

.