For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानची नाकेबंदी

06:48 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानची नाकेबंदी
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर बिहारच्या भूमीवरून पाकिस्तानला आणि त्यांच्या पाठीराख्यांना इंग्रजीतून इशारा देत जे वक्तव्य केले होते त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. पाकिस्तानला एक जोराचा तडाखा देत त्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे. त्यामुळे आयात निर्यातीच्या निमित्ताने भारताकडे येण्याचे पाकिस्तानचे प्रयोजन सुद्धा आता संपले आहे. आता जनावरांचा चारा सुद्धा त्यांना इतर देशातून आयात करावा लागेल. सिंधू नदीचे पाणी तोडण्याचा इशारा देऊन आधीच पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या पंतप्रधानांच्या वक्तव्याने पाकिस्तानातील राजकारणी हादरले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बारा दिवसांनी त्याचा बदला घेतला होता. त्यामुळे आता देखील पंतप्रधान मोदी थांबून असा पुन्हा बदला घेतील अशी भीती आता पाकिस्तानला वाटू लागली आहे. त्यामुळे जगातील इतर देशांकडे मदतीसाठी धावा धाव सुरू केली आहे. अशा काळात आयात निर्यात पाकिस्तानच्या उरात आणखी धडकी भरणार आहे. अर्थात भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये व्यापार कमी कमी होत आला आहे. मध्यंतरी भारताने पाकिस्तानातून आयातीवर 200 टक्के शुल्क लागू केले होते. आधीच पाकिस्तानातून येणाऱ्या निकृष्ट मालाला मागणी कमी. त्यात 200 टक्के शुल्कानंतर त्याच्या वाढलेल्या किमतीमुळे खरेदीदार मिळणे मुश्किल अशी स्थिती असताना आता उरला सुरला व्यापारही बंद पडणे पाकिस्तानसाठी धोक्याचेच बनले आहे. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानचे मस्तक अधिक उठले नाही तरच नवल.  आता पाकिस्तानच्या जहाजांना भारताच्या बंदरात प्रवेशही दिला जाणार नाही. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर या दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई क्षेत्रदेखील बंद केले आहे. आता पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या जहाजाला भारताच्या कोणत्याही बंदरात येण्याची परवानगी दिली जाणार नाही. भारताचा झेंडा लावलेलं कोणतंही जहाज पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरात जाणार नाही. एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारतानं पाकिस्तानकडून 4 लाख 20 हजार डॉलर किमतीच्या मालाची आयात केली आहे. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजे एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत भारतानं पाकिस्तानकडून जवळपास 28 लाख 60 हजार

Advertisement

डॉलर किमतीच्या मालाची आयात केली होती. तर एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारताकडून पाकिस्तानला होणारी निर्यात घटून 44.765 कोटी डॉलरवर आली आहे. तर एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान भारताकडून पाकिस्तानला 1.1 अब्ज डॉलर किमतीच्या मालाची निर्यात झाली होती. आता ती सगळीच थांबली. जनावरांचा चाराही पाकिस्तानला आता इतर राष्ट्रातून आणावा लागेल. भारताने 1960 चा सिंधू करार रद्द करतानाच अटारी इंटिग्रेटेड चेकपोस्ट बंद केले आहे. भारताने सुविधेंतर्गत दिलेले व्हिसा रद्द करताच पाकिस्ताननेही शिख सोडून इतर भारतीयांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारताने सिंधू जलकराला संबंधी काही बांधकाम केले तर ते आम्ही विमानाने उद्ध्वस्त करू. आमच्या देशातील लोकांना तहान आणि भुकेने व्याकुळ करून मारण्यासारखे आहे. अशी भीतीही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. हीच अवस्था पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांचीही झाली आहे.  सिंधू नदीत एकतर पाणी वाहत राहील किंवा त्यांचं रक्त असं ते पब्लिक रॅलीमध्ये म्हणाले. त्यानंतर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटताच  त्यांनी बीबीसीकडे बोलताना, जनतेच्या भावना जशा असतात तसे नेता म्हणून बोलावे लागते असे सांगून आपल्या मनातील भीती अधिक गडद झाल्याचे सिद्ध केले. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी  खूपच धडपड सुरू केली असून अरब राष्ट्रांतील कोणी भारताची समजूत काढेल का? याची चाचपणी सुरू केली आहे. भारताने पाकिस्तानचा सहभाग असल्याचा पहेलगाम घटनेबाबत अद्याप कोणताही पुरावा दिलेला नाही. पुलवामावेळी भारताने 12 दिवसांनी हल्ला केला होता.  त्यामुळे आताही दोन्ही देशांमधे निर्माण झालेला युद्धाचा धोका टळला किंवा कमी झाला असं इतक्यात म्हटलं जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेन्स यांनी पहलगाम हल्लासाठी पाकिस्तानला काही अंशी जबाबदार ठरवलं होतं. पाकिस्तानने भारताला हल्लेखोर शोधण्यासाठी आवश्यक ती मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले होते. कारण ते सहकुटुंब भारतात असताना हा हल्ला झाला होता. त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारल्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी भारताला त्यांची प्रतिष्ठा वाचवण्याची एक संधी वेन्स यांनी उपलब्ध करून दिली असून त्यांचं वक्तव्य व्हाईट हाऊसचे वक्तव्य नव्हे अशी उलटी ओरडही केली आहे.  या काळातच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियासह अन्य देशांना भारतावर दबाव टाकावा, असा आग्रह धरला आहे. शरीफ यांनी शुक्रवारी इस्लामाबादमध्ये सौदी अरेबियाचे राजदूत नवाब विन सईद अल मालिकी यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केल्याचेही स्पष्ट झाले आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तानने पुकारलेल्या युद्धात गेल्या काही वर्षात 90 हजाराहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आणि पाकिस्तानने आत्तापर्यंत 152 अब्ज डॉलर्सचं नुकसान सोसल्याचे ते अरब राष्ट्रांच्या राजदूतांची भेट घेऊन सांगत आहेत. भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं युट्यूब चॅनेल आणि इन्स्टाग्राम तसेच सोशल मीडिया अकाऊंटही ब्लॉक केलं आहे.  पाकिस्तानी खेळाडू आणि अभिनेत्यांनी देखील हा फटका सोसला आहे. पाकिस्तानची अशी नाकेबंदी होत असताना घाबरलेले पाकिस्तानी नेते रोज नव्याने धावपळ करताना दिसू लागले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.