बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिक ठार
बलोच लिबरेशन संघटनेचा क्वेट्टा येथे मोठा हल्ला
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पेहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झालेला असतानाच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बालोच लिबरशन आर्मीने केलेल्या हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत, असे वृत्त आहे. हा हल्ला बलुचिस्तानमधील महत्वाचे शहर क्वेट्टा येथील एका उपनगरात करण्यात आला.
हे पाकिस्तानी सैनिक या उपनगरात गस्त घालत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. बलोच लिबरेशन आर्मीच्या तीन ते चार बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांच्या वाहनावर जोरदार गोळीबार केला. त्यात हे सैनिक ठार झाले, अशी माहिती या संघटनेकडून देण्यात आली आहे. पाकिस्तान लष्कराने अद्याप या माहितीला दुजोरा दिला नसला, तरी हे वृत्त नाकारलेलेही नाही.
पाकिस्तानच्या स्थैर्याला धक्का
बलुचिस्तान प्रांत हा पाकिस्तानातील सर्वात कमी लोकसंख्येचा, पण आकाराने सर्वात मोठा प्रांत आहे. या प्रांतात साधारणत: 70 लाख बलोच नागरीक आहेत. त्यांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच पाकिस्तानी प्रशासनाविरोधात लढा चालविलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या संघर्षाला धार चढलेली असून अनेक पाकिस्तानी सैनिकांचा बळी बलोच स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेक सशस्त्र संघटनांनी घेतला आहे.
200 सैनिकांचा बळी
काही आठवड्यांपूर्वी क्वेट्टा नजीक एका पाकिस्तानी रेल्वेला अडवून या रेल्वेतून जाणाऱ्या 200 पाकिस्तानी सैनिकांचे अपहरण बलोच लिबरेशन आर्मीने केले होते. या सर्व सैनिकांची हत्या करण्यात आली होती. हा पाकिस्तानच्या लष्कराला मोठाच धक्का होता. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने बलुची स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या विरोधात मोठी आघाडी उघडण्याचा विचार चालविला होता. तथापि, अद्याप तशी कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावामुळे पाकिस्तानची बहुतेक फौज भारताच्या सीमेकडे हलविण्यात येत आहे. त्यामुळे बलुचिस्तानकडे पाकिस्तानला दुर्लक्ष करावे लागत असून ही बलुचिस्तानातील योद्ध्यांसाठी सुसंधी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. बलुची बंडखोरांनी घेतलेला 10 पाकिस्तानी सैनिकांचा बळी ही याचीच झलक आहे, असे दिसून येत आहे. भारताविरुद्ध जो दहशतवाद पाकिस्तानने पोसला, त्याची किंमत पाकिस्तानला अनेक मार्गांनी भोगावी लागत आहे. बलुचिस्तान सध्या पाकिस्तानसाठी सर्वात मोठी डोकेदुखी बनला आहे, असे मत व्यक्त होत आहे.