For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

06:33 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
Advertisement

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असतानाच, पाकिस्ताने पुन्हा एका क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा केला आहे. ‘फताह’ नामक या क्षेपणास्त्राचा पल्ला 120 किलोमीटर असून ते भूमीवरुन भूमीवर मारा करु शकते, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी अब्दाली या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. एका आठवड्यात अशा दोन चाचण्यांचा दावा झाला आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण विभागाने एका वृत्तनिवेदनात ही माहिती दिली आहे. नवी चाचणी पाकिस्तानच्या सेनादलांच्या सज्जतेचे परीक्षण करण्यासाठी आणि क्षेपणास्त्र यंत्रणेचे परीक्षण करण्यासाठी करण्यात आली आहे, असे या वृत्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अब्दाली आणि फताह ही दोन्ही क्षेपणास्त्रे भारतात खोलवर मारा करण्यास सक्षम आहेत, असा दावा पाकिस्ताकडून करण्यात आला आहे.

Advertisement

सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन

क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांसमवेतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये सातत्याने गोळीबार करुन सलग 10 दिवस शस्त्रसंधीचा भंग केला आहे. भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानच्या आघाडीवरच्या चौक्यांवर आणि बंकर्सवर जोरदार मारा चालविला आहे. पाकिस्तान छोट्या गन्स आणि उखळी तोफांच्या माध्यमातून भारतावर मारा करण्याचा प्रयत्न केला आहे.

चिथावणीखोर कार्यक्रम

अब्दाली आणि फताह यासारख्या क्षेपणास्त्रांची चाचणी करुन पाकिस्तान भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्याच्या तणावात भर टाकण्याचा त्या देशाचा प्रयत्न आहे. तसेच, स्वत:ची भीती लपविण्याचाही हा केविलवाणा उपाय आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या संरक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

भारतही सज्ज

पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही आव्हानाला चिरडण्याची भारताची क्षमता असून आमची संरक्षण दले कोणत्याही परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज आहेत, असे प्रतिपादन भारताकडून करण्यात आले आहे. भारताच्या वायुदलाने सीमावर्ती भागात जोरदार युद्धाभ्यास चालविला असून नौदल आणि भूदलानेही आवश्यक ती व्यवस्था केली असल्याची माहिती देण्यात आली.

सायबर हल्ल्याचा प्रयत्न

भारताच्या संरक्षण दलांच्या वेबसाईटस्वर सायबर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानातील सायबर गुन्हेगारांनी भारताच्या संरक्षण दलांच्या वेबसाईटस् हॅक करण्याचा प्रयत्न करुन त्यांच्यातील माहिती हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारताच्या सायबर तज्ञांनी त्वरित हा हल्ला हाणून पाडला. गेल्या दोन आठवड्यांमध्ये सात वेळा पाकिस्तानने असा प्रयत्न केला आहे.

Advertisement
Tags :

.