शफीक, साजिदमुळे पाकिस्तान विजयाच्या मार्गावर
वृत्तसंस्था, क्विन्स पार्क ओव्हल
त्रिनिदाद येथील क्विन्स पार्क ओव्हलवर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, अब्दुल्ला शफीकचे नाबाद शतक आणि फिरकीपटू साजिद खानने घेतलेल्या चार बळींमुळे पाकिस्तान विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तिसऱ्या दिवसाच्या खेळ थांबला तेंव्हा वेस्ट इंडिजची स्थिती बिकट होती. त्यांनी दुसऱ्या डावात 40.5 षटकांत 6 बाद 103 धावा केल्या होत्या आणि त्यांच्या हातात केवळ 4 गडी शिल्लक असताना त्यांची आघाडी केवळ 60 धावांची होती. शफीकने 15 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 160 धावांची खेळी केली. तर बाबर आझमने 88 धावांचे योगदान दिले. यामुळे पाकिस्तानला पहिल्या डावात 115 षटकांत 387 धावा करता आल्या आणि त्यांना 43 धावांची माफक आघाडी मिळाली. पहिल्या डावात अधिक मोठी आघाडी न घेता आल्याची खंत पाकिस्तानला नक्कीच वाटेल. कारण त्यांनी शेवटचे चार बळी अवघ्या 17 धावांत गमावले होते. वेस्ट विंडीजसाठी डावखुरा फिरकीपटू जोमेल वॉरिकनने 112 धावांत 6 बळी घेतले. यात एकाच षटकातील तीन बळींचा समावेश होता.
वेस्ट इंडिजच्या दुखापतींच्या समस्या आणि पडझड
दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला. क्षेत्ररक्षण करताना पाठिला दुखापत झाल्यामुळे सलामीवीर ब्रँडन किंग फलंदाजीसाठी उतरु शकला नाही. बाबरला धावबाद करून त्याचे शतक रोखण्यासाठी स्ट्रायकर एंडवर थेट थ्रो मारण्याच्या प्रयत्नात तो पाठीवर पडला आणि त्याला ही दुखापत झाली.
पाकिस्तानसाठी ऑफ स्पिनर साजिदने गोलंदाजीत चमक दाखविली आणि पुन्हा एकदा चार बळी 4-32 मिळवले. त्याने टॅगेनरीन चंद्रपॉल 17, अमीर जंगू 13, शाई हॉप 15 आणि जेडेन सील्स 9 यांना बाद केले. डावखुरा फिरकीपटू अली उस्माननेही कावेम हॉज 34 आणि विंडीजचा कर्णधार रोस्टन चेस 17 यांचे बळी घेत विंडीजला पराभवाच्या उंबरठ्यावर आणले. दिवसाच्या अखेरीस वेस्ट विंडीजची थोडी पडझड झाली. त्यांनी शेवटच्या पाच षटकांत अवघ्या चार धावांत शेवटचे तीन बळी गमावले. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर चेस बाद झाला. त्याने उस्मानला अतिशय सोपा रिटर्न कॅच दिला.