पाकने हिंसेचा मार्ग सोडावा
एनसी अध्यक्ष फारुख अब्दुल्लांचे उद्गार : जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
वृत्तसंस्था, श्रीनगर
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला जम्मू-काश्मीरमधील हिंसेचे चक्र समाप्त करण्याचे आवाहन केले. पाकिस्तानने हिंसेचा मार्ग सोडून द्यावा. जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग न मानण्याच्या पाकिस्तानच्या चिथावणीपूर्ण कृतीमुळे हिंसेला बळ मिळते, असे उद्गार अब्दुल्ला यांनी काढले आहेत. दोन्ही देशांनी शांततेचे मार्ग शोधावेत. पहलगाम हल्ल्यामुळे बंधुभाव पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नांसाठी मोठा झटका बसला असल्याचा दावा अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत केला आहे.
काश्मीरच्या लोकांचा स्पष्ट संदेश
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली. दहशतवाद अस्वीकारार्ह असल्याच स्पष्ट संदेश यामुळे पाकिस्तानला मिळाला. पाकिस्तान दहशतवादाचे समर्थन करणार नाही अशी अपेक्षा आहे. जम्मू-काश्मीरचे लोक शांतताप्रिय असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले.
ड्रग्ज सर्वात मोठा धोका
जम्मू-काश्मीरमध्ये युवांसाठी सर्वात मोठा धोका उग्रवाद नाही, तर ड्रग्ज आहे. अमली पदार्थांच्या तस्करीत काही स्थानिक लोकांचा सहभाग आहे. ड्रग्ज तस्करीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ही लढाई केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक मातापिता आणि नागरिकाने एकजूट व्हायला हवे. युद्ध कुठल्याही समस्येवर उपाय नसल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.