भारताच्या हल्ल्यानंतर पाकचा बाजार 10 हजार अंकांनी कोसळला
वृत्तसंस्था/मुंबई
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केएसई-100 13 टक्के घसरला आहे, तर केएसई-30 आतापर्यंत 14 टक्क्यांनी आपटला आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर 8 मे रोजी पाकिस्तानचा शेअर बाजार 6 टक्केपेक्षा जास्त घसरला आहे. कराची-100 निर्देशांक 6,950 अंकांनी घसरून 103,060 वर व्यवहार करत आहे. कालही बाजार 3,556 अंकांनी (3.13 टक्के) घसरला होता. म्हणजेच, दोन दिवसांत पाकिस्तानचा बाजार 10,000 अंकांनी घसरला.
पाकच्या गुंतवणूकदारांचे लक्ष आयएमएफच्या निर्णयाकडे
पाकिस्तानमधील गुंतवणूकदारांच्या नजरा आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निर्णयावर आहेत. यामध्ये आयएमएफ पाकिस्तानला निधी सुविधा वाढवायची की नाही हे ठरवेल. आयएमएफ उद्या म्हणजेच (आज)9 मे रोजी आपला निर्णय जाहीर करणार आहे.
भौगोलिक राजकीय तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम नाही
हवाई हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील भू-राजकीय तणावाचा भारतीय बाजारावर कोणताही परिणाम दिसून येत नाही. आठवड्याच्या चौथ्या व्यापार दिवशी म्हणजेच गुरुवार, 8 मे रोजी शेअर बाजार खाली आला आहे. दुपारच्या दरम्यान सेन्सेक्स 150 अंकांपेक्षा जास्त घसरून 80,600 वर व्यवहार करत होते. निफ्टी देखील सुमारे 100 अंकांनी खाली आहे.