पाकिस्तानला समुद्रातून हल्ल्याची भीती
ग्वादर बंदराच्या संरक्षणासाठी 25 जेट विमाने तैनात
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने आपल्या पश्चिमेकडील ग्वादर बंदरावर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पाकिस्तानने कराची एअरबेसवर 25 चिनी बनावटीचे जे10सी आणि जेएफ17 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. हल्ला झाल्यास ही जेट्स काही मिनिटांत बचाव मोहिमेवर ग्वादर बंदरावर पोहोचू शकतात. भारत समुद्रमार्गे मोठा हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला असल्यामुळे सुरक्षा दलाकडून सावधगिरीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. अमेरिकेकडून मिळालेली एफ16 विमाने लढाऊ हवाई गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, उत्तर आणि ईशान्येकडील सैन्य आणि हवाई दलाच्या हल्ल्यांच्या भीतीने पाकिस्तानने बलुचिस्तानमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले पासनी हवाई तळ, गिलगिट बाल्टिस्तानमधील स्कार्दू हवाई तळ आणि खैबर पख्तूनख्वा येथील स्वाट हवाई तळ सक्रिय केले आहेत. येथे जेट्स उ•ाण करत आहेत. कराची-लाहोर ते स्कार्दू पर्यंतची नागरी उ•ाणे देखील रद्द करण्यात आली आहेत.
आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवर पाकिस्तानने लावले पुन्हा झेंडे
आंतरराष्ट्रीय सीमेवरील कठुआ जिह्यातील प्रग्याल येथील पाकिस्तानी चौक्यांवर पाक रेंजर्सनी गुरुवारी नवीन झेंडे फडकवले. यापूर्वी जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) अनेक चौक्यांवरील झेंडे काढून टाकण्यात आले होते.
सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन
बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर येथे नियंत्रण रेषेजवळ सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैन्याने हलक्या शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
भारत-पाकिस्तानने संवादातून तोडगा काढावा : तालिबान
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारत आणि पाकिस्तानने सर्व समस्या संवादाद्वारे सोडवल्या पाहिजेत, असे म्हटले आहे. आम्ही प्रादेशिक संघर्षाचे समर्थन करत नाही. मात्र, दोन्ही देश टोकाची भूमिका न घेता योग्य मार्ग शोधतील असा आमचा विश्वास असल्याचेही मुत्ताकी पुढे म्हणाले.