बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकचा भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार
पाकिस्तान सरकारचा आणखी एक ड्रामा : टी-20 वर्ल्डकपमध्ये मात्र सहभागी होणार : आयसीसीच्या भूमिकेकडे लक्ष
वृत्तसंस्था/ कराची, दुबई
बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानचा संघ आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत 15 फेब्रुवारी रोजी होणारा भारताविरुद्ध सामना खेळणार नसल्याची माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकताना वर्ल्डकपमधील इतर सामने मात्र खेळणार असल्याचे पीसीबीने स्पष्ट केले आहे. पाकच्या या ड्रामेबाजीनंतर आयसीसी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचे कारण पाक सरकारने स्पष्ट केलेले नाही.
पाकिस्तानने रविवारी जाहीर केले की, ते 2026 च्या टी 20 विश्वचषकात सहभागी होतील, परंतु भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकतील. बांगलादेश सरकारने भारतात खेळण्याबाबत सुरक्षेच्या चिंता व्यक्त केल्यानंतर, आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून काढून टाकल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला. अर्थात, आता बहुप्रतिक्षित 15 फेब्रुवारी रोजी होणारा भारत-पाकिस्तान सामना खेळला जाणार नाही. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हाय-व्होल्टेज सामन्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, आयसीसीला आर्थिक नुकसान पोहोचवण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
आयसीसीच्या भूमिकेकडे लक्ष
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि मोहसिन नक्वी यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर काही मिनिटांतच ही घोषणा करण्यात आली. नक्वी यांनी काहीच दिवसापूर्वी पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि सांगितले होते की, टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय 2 फेब्रुवारीपर्यंत घेतला जाईल. अखेर पाकने स्पर्धेत सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे, मात्र भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. आता आयसीसी काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.